Skip to content
Home » शनि परिवर्तन – वृषभ रास

शनि परिवर्तन – वृषभ रास

शनि परिवर्तन – वृषभ रास

शनि करतील कर्मात वृद्धी

होईल प्रगती, उन्नती, समृद्धी

 

नमस्कार!

      मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बर्‍याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या वृषभ राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astrogurudrjyotijoshi

      ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

      २०२२ या वर्षाचा आपण जेव्हा विचार करतो आणि या एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तर कुठेतरी एक युग परिवर्तनाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे राशी परिवर्तन होत त्याच्या अभ्यास आपण केला तर रवि ग्रह मेष राशीत प्रवेश करुन उच्चीचा होणार आहे. मात्र तिथेच राहु देखील आलेला असेल. ज्यामुळे रविला ग्रहण लागेल. गुरु ग्रह मीन या आपल्या स्वराशीत असेल. तेव्हा तिथेच शुक्र ग्रह देखील उच्चीचा असेल. म्हणजे गुरु आणि शुक्र हे दोन्ही मीन राशीत मात्र राहु आणि शनि या दोन ग्रहांच्या पाप कर्तरीत अडकलेले असतील. निसर्ग कुंडलीचं लाभ स्थान आपण बघितलं असता शनि महाराज कुंभ या स्वत:च्या मूळ त्रिकोण राशीत असतील. ज्यामुळे ते अत्यंत बलवान होतील. मात्र त्यावेळी तिथे त्यांचा आदर्श शत्रु मंगळ देखील आलेला असेल. एकंदरीत प्रत्येकच ग्रहाची स्थिती पाहिली असता किंवा निसर्ग कुंडलीचा विचार केला असता अनेक संकटमय स्थिती कुठेतरी निर्माण होतांना दिसत आहे. तरी देखील या स्थितीचे काही शुभ परिणाम देखील आहेत. #drjyotijoshi

      शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

      मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा त्रासदायक जातो. दुसरा टप्पा प्रगतीचा तर तिसरा टप्पा हा आर्थिक प्राप्ती, उन्नतीचा ठरतो. थोडक्यात वृषभ राशीसाठी शनि महाराजांची साडेसाती ही लाभदायक ठरते. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदार्‍या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

      शनि महाराज साधारणपणे अडीच वर्ष एका राशीत राहतात. मात्र प्रत्येक वर्षी ते काही काळासाठी वक्री देखील होतात. त्यानुसार १२ जुलै २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मकर राशीत प्रवेश करतील. शनि सारखा पुढे आलेला ग्रह जेव्हा पुन्हा मागील राशीत जातो तेव्हा त्याचा एक विशिष्ट्य उद्देश असतो तेव्हा त्याला काही तरी आठवतं की आपली काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत. ती आपण पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी तो वक्री होऊन मागील राशीत प्रवेश करतो आणि राहिलेली सर्व अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शनिच्या मकर गोचरचा जो प्रभाव एखाद्याला पूर्ण मिळू शकलेला नसेल. मग तो प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार चांगला असो किंवा वाईट असो, तो राहिलेला प्रभाव पूर्ण करण्यासाठी शनि महाराज पुन्हा एकदा १२ जुलै २०२२ रोजी मकर राशीत प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी पर्यंत ते तिथेच राहतील. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं हे संपूर्ण गोचर धनिष्ठा नक्षत्रातून होणार आहे.

      आता आपण तुमच्या वृषभ राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

      वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीला शनि महाराज हे मूळत: राजयोगकारक ग्रह आहेत. कारण वृषभ पत्रिकेतील भाग्य आणि कर्म या दोन स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत त्यांचा प्रवास धर्म स्थानातून म्हणजे तुमच्या भाग्य स्थानातून सुरु होता. आता ते राशी परिवर्तन करुन कुंभ रास म्हणजे तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहेत. धर्म स्थानातील शनि महाराज हे मुख्यत: गत जन्माविषयी संकेत देतात. गत जन्म या विषयाचा विचार केला असता प्रामुख्याने चार ग्रह त्याविषयी आपल्याला संकेत देत असतात. ते म्हणजे गुरु, शनि, केतु आणि चंद्र होय. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण मोक्षाचा विचार करतो, तेव्हा देखील हेच चार ग्रह संकेत देतात. म्हणूनच शनि महाराजाच्या स्थितीला अत्यंत महत्त्व असतं. अत्यंत मंद ग्रह म्हणून आपण शनिला ओळखतो. मंद आहे म्हणूनच त्याला प्रत्येक काम व्यवस्थितीत, अगदी चोखपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने करायचं असतं. शनि महाराजांचा मनुष्य जीवनावर त्यामुळे अत्यंत तीव्र व मोठा परिणाम घडून येतो. त्यांच्या गोचरचा, मूळ पत्रिकेतील स्थितीचा, राशी पत्रिकेतील स्थितीचा, नवमांशातील स्थितीचा एकंदरीत प्रभाव मनुष्य जीवनावर पडत असतो. किंबहूना शनि महाराज कोणत्या नक्षत्रातून गोचर करीत आहेत त्याचं देखील विशेषत्वाने महत्त्व असतं.

      वृषभ राशीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा शनि महाराज आता धनिष्ठा नक्षत्रातून प्रवास करीत आहेत. कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतरही ते धनिष्ठा नक्षत्रातच राहतील. कारण या नक्षत्राचे दोन चरण मकर राशीत आणि दोन चरण कुंभ राशीत येतात. मकर आणि कुंभ या दोन्हीही शनि महाराजांच्याच राशी आहेत. आता धनिष्ठा नक्षत्र म्हणजे काय? तर या नक्षत्राचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे. शनि आणि मंगळ हे दोन्ही शत्रु ग्रह किंबहूना एकमेकांच्या विरुद्ध कारकत्व असणारे ग्रह म्हणून ओळखले जातात. कारण शनि म्हणजे शांतपणा, अनुभव समृद्ध, संयमी असा ग्रह होय. उलट मंगळ म्हणजे उत्साह, अतिरेक, आक्रमक, तीव्रता दर्शविणारा ग्रह होय. आता शनि महाराज मंगळाच्या नक्षत्रातून प्रवास करीत असून एप्रिल महिन्यात ते कुंभ या आपल्या आवडत्या राशीत प्रवेश करणार आहेत. आवडती रास असल्यामुळे त्यांचं बळ निश्चितच वाढणार आहे. निसर्ग कुंडलीचा विचार केला असता लाभ स्थानात प्रवेश करुन ते जातकांना लाभ प्रदान करणार आहेत. मात्र आता आपण वृषभ राशीवर चर्चा करीत आहोत. तर तुमच्या राशीच्या दशम स्थानात ते आता प्रवेश करणार आहेत. त्यावेळी तिथे देखील मंगळ असेल. म्हणजे शनि महाराज मंगळाच्या नक्षत्रातून प्रवास करीत आहे आणि मंगळ त्यांच्यासह कुंभ राशीत विराजमान असेल. मंगळ-शनिची ही युती जास्त महत्त्वपूर्ण ठरेल. साहजिकच तिचे परिणामही अत्यंत तीव्र स्वरुपाचे असतील. अर्थात ते परिणाम शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारचे असतील.

      मात्र वृषभ राशीचा विचार केला असता तुमच्या दशम स्थानात ही युती होणार आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान असल्यामुळे ते मंगळ आणि शनि या दोघांना मानवणारं स्थान आहे. त्यात वृषभ राशीसाठी शनि महाराज हे राजयोगकारक ग्रह ठरतात. त्यामुळे ही युती अनेक अर्थांनी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शनि महाराजांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रभावशाली मानल्या जातात. म्हणजे पत्रिकेतील दोन स्थानं आणि तीन दृष्ट्या अशा एकूण पाच स्थानांवर त्यांचा प्रभाव पडतो. त्यानुसार दशम स्थानातील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडेल. ही योगकारक असलेल्या शुभ ग्रहाची दृष्टी असल्यामुळे तेथून देखील तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील. कारण दशम स्थान हे मूळत: कर्माचं, व्यवसायाचं स्थान आहे. तसेच व्यय स्थानावरुन आपण खर्चासह परदेशगमन देखील बघतो. जे वृषभ जातक परदेशाशी संबंधित एखादा व्यवसाय करीत आहेत, त्यांना विशेष लाभ या काळात प्राप्त होऊ शकतो. #astrogurudrjyotijoshi

      यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन आपण वास्तु, वाहन, सुखशांती या गोष्टी बघतो. त्यानुसार या काळात तुमच्यासाठी वास्तु व वाहनाचे अत्यंत शुभ योग निर्माण होतील. घरात सुखशांतीसह समृद्धी नांदेल. यामुळे तुमचं भाग्य देखील समृद्ध होणार आहे. थोडक्यात शनि महाराजांची ही दृष्टी देखील अनेक अर्थाने तुमच्यासाठी शुभदायक ठरणार आहे. मात्र शनि महाराज कितीही शुभ किंवा राजयोगकारक असले तरी विलंब ही त्यांची विशेष ओळख आहे. त्यांचे हे कारकत्व येथे चुकणार नाही. तरीही ही सर्व सुखं ते तुम्हाला नक्कीच प्रदान करतील, हे देखील तितकंचं सत्य आहे.

      यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थानाला वैवाहिक जोडीदाराचं स्थान मानलं जातं. तसेच या स्थानावरुन व्यवसाय देखील बघितला जातो. ऐरवी शनि महाराजांची या स्थानावर पडणारी दृष्टी ही पूर्णत: अशुभ मानली जाते. मात्र राजयोगकारक ग्रहाची आपल्या मूळ त्रिकोण राशीतून पडणारी ही दृष्टी असल्यामुळे ती तुमच्यासाठी शुभता नक्कीच निर्माण करेल. या काळात तुम्ही आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा, आपले कर्तव्य पूर्ण करा, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कारण या काळातील हाच तुमच्यासाठी यशाचा मंत्र राहिल. म्हणजे हे केल्यानंतरच तुम्हाला शनि महाराजांची शुभता प्राप्त होऊ शकेल. एकंदरीत शनि महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. #bestastrologerinmaharashtra

      मात्र जसं आपल्याला माहिती आहे की शनि महाराज २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करतील. त्यानंतर १२ जुलै रोजी ते वक्री होऊन पुन्हा एकदा मकर राशीत जातील. एखादा ग्रह वक्री होऊन मागच्या राशीत जातो, कारण पुढे आल्यानंतर त्याला आठवतं की मागे आपलं काहीतरी काम अपूर्ण राहिलं आहे. ते पूर्ण करण्यासाठीच तो मागे जातो. त्यानुसार राहिलेली कामं पूर्ण करतो आणि पुन्हा एकदा पुढच्या राशीत जातो. शनि महाराज जेव्हा मकर राशीत येतील तेथून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडेल. म्हणजे त्यांना असं वाटेल की जेवढा लाभ आपण वृषभ राशीला द्यायला हवा होता, तेवढा दिला नाही. त्यामुळे त्या काळात ते तुम्हाला अधिकचा लाभ प्रदान करतील. त्यांची सप्तम दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर पडेल. म्हणजे त्यांना हेही जाणवेल की वृषभ जातकांकडून आपल्याला जेवढी कार्ये करवून घ्यायची होती, ती कुठेतरी अपूर्ण राहिली आहेत. म्हणून या काळात ते तुम्हाला परिश्रम करायला लावतील. त्यानंतर त्यांची दशम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. जी तुम्हाला नोकरी यश आणि प्रगती देईल. १२ जुलै रोजी शनि महाराज तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करतील आणि जानेवारी २०२३ पर्यंत ते तिथेच विराजमान असतील. या संपूर्ण काळात तुम्हाला याच पद्धतीने फळं प्राप्त होतील. त्यानंतर ते पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे तेथील जी अत्यंत शुभ फळं आहेत ती तुम्हाला खर्‍या अर्थाने तेव्हापासून प्राप्त व्हायला सुरुवात होईल. एकंदरीत वृषभ राशीसाठी शनि महाराजांचं गोचर हे लाभदायक आणि प्रगतीदायक आहे, यात कुठलाच वाद नाही. तब्बल ३० वर्षांनी हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी उगविणार आहे. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करायला हवा. या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात वृषभ जातकांनी महादेवाला दररोज काळे तीळ वाहावेत. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astroguruma

      अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणार्‍या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *