Skip to content
Home » शनि परिवर्तन – मकर रास

शनि परिवर्तन – मकर रास

शनि परिवर्तन – मकर रास

शनि करतील आर्थिक उन्नति

लाभदायक ठरेल साडेसाती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या मकर राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguruma

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

२०२२ या वर्षाचा आपण जेव्हा विचार करतो आणि या एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तर कुठेतरी एक युग परिवर्तनाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे राशी परिवर्तन होत त्याच्या अभ्यास आपण केला तर रवि ग्रह मेष राशीत प्रवेश करुन उच्चीचा होणार आहे. मात्र तिथेच राहु देखील आलेला असेल. ज्यामुळे रविला ग्रहण लागेल. गुरु ग्रह मीन या आपल्या स्वराशीत असेल. तेव्हा तिथेच शुक्र ग्रह देखील उच्चीचा असेल. म्हणजे गुरु आणि शुक्र हे दोन्ही मीन राशीत मात्र राहु आणि शनि या दोन ग्रहांच्या पाप कर्तरीत अडकलेले असतील. निसर्ग कुंडलीचं लाभ स्थान आपण बघितलं असता शनि महाराज कुंभ या स्वत:च्या मूळ त्रिकोण राशीत असतील. ज्यामुळे ते अत्यंत बलवान होतील. मात्र त्यावेळी तिथे त्यांचा आदर्श शत्रु मंगळ देखील आलेला असेल. एकंदरीत प्रत्येकच ग्रहाची स्थिती पाहिली असता किंवा निसर्ग कुंडलीचा विचार केला असता अनेक संकटमय स्थिती कुठेतरी निर्माण होतांना दिसत आहे. तरी देखील या स्थितीचे काही शुभ परिणाम देखील आहेत. #astroguruma

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा आर्थिक दृष्ट्या नुकसान करणारा, जबाबदाऱ्या नाकारण्याची वृत्ती निर्माण करणारा ठरतो. एखादा विषयापासून आपण जर लांब राहिलो तर फार उत्तम, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. भावंडांशी मतभेद सुरु होतात. किंबहूना वडीलांसोबतच मतभेद निर्माण होतात. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अत्यंत नकारात्मकता तयार होते. दुसरा टप्पा सुरु झाल्यावर मकर जातकांना जबाबदारीची जाणीव होते. ते जबाबदाऱ्या पूर्ण करायला लागतात. जबाबदारी स्विकारणं, भावंडांशी सौख्य वाढविणं, वडीलांप्रती सन्मानाने कार्य करणं, या भूमिका त्यांच्या निर्माण होतात. जर या भूमिका निर्माण झाल्यात तर तिसरा टप्पा त्यांच्यासाठी प्रगतीचा आर्थिक लाभाचा ठरतो. मात्र दुसऱ्या टप्प्यात योग्य जबाबदारी जाणिव न झाल्यास तिसऱ्या टप्प्यात संघर्ष अजून जास्त वाढतो. असं म्हणतात की शनि महाराज स्वत:च्या राशीला फारसा त्रास देत नाहीत. हे थोडंसं अर्धसत्य आहे. कारण शनि महाराज हे विश्वाचे न्यायाधिश म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते आपल्या राशींसोबतही न्यायानेच वागतात. मात्र शनि महाराजांची रास असेल आणि तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत असाल तर ते तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाहीत. उलटपक्षी ते तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरुन आशीर्वाद देतील. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. #drjyotijoshi

      शनि महाराज साधारणपणे अडीच वर्ष एका राशीत राहतात. मात्र प्रत्येक वर्षी ते काही काळासाठी वक्री देखील होतात. त्यानुसार १२ जुलै २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मकर राशीत प्रवेश करतील. शनि सारखा पुढे आलेला ग्रह जेव्हा पुन्हा मागील राशीत जातो तेव्हा त्याचा एक विशिष्ट्य उद्देश असतो तेव्हा त्याला काही तरी आठवतं की आपली काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत. ती आपण पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी तो वक्री होऊन मागील राशीत प्रवेश करतो आणि राहिलेली सर्व अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शनिच्या मकर गोचरचा जो प्रभाव एखाद्याला पूर्ण मिळू शकलेला नसेल. मग तो प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार चांगला असो किंवा वाईट असो, तो राहिलेला प्रभाव पूर्ण करण्यासाठी शनि महाराज पुन्हा एकदा १२ जुलै २०२२ रोजी मकर राशीत प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी पर्यंत ते तिथेच राहतील. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं हे संपूर्ण गोचर धनिष्ठा नक्षत्रातून होणार आहे.

आता आपण तुमच्या मकर राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही शनि महाराजांची स्वत:ची रास आहे आणि सध्या तुमच्या राशीतूनच त्याचं गोचर सुरु आहे. २९ एप्रिल रोजी ते कुंभ राशीत प्रवेश करतील. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु होणार आहे. साडेसातीचे नियम ठरलेले आहेत. तुम्ही कर्म कसे केले? किती जबाबदाऱ्या निभावल्या? तुम्ही किती न्यायाने वागलात? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असली तर शनि महाराज साडेसातीत कोणताही त्रास जातकाला न देता भरभरुन शुभ फळं देतात. सध्या तुमच्या राशीतून शनि महाराजांचं गोचर सध्या सुरु आहे. याचा अर्थ तुमच्या राशीला पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या शश हा राजयोग सुरु आहे. ज्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होत आहे. मात्र ही फळं देण्यापूर्वी शनि महाराज निश्चितच बघतात की जो मकर जातक आहे, त्याने किती जबाबदाऱ्या निभावल्या? तो किती न्यायाने वागतोय? तो कर्तव्य किती पूर्ण करतोय? त्यावर त्यांच्या फळांची दिशा ठरत असते. कारण कर्म फलदाता म्हणून शनि महाराजांची विशेष ओळख आहे. तर गत पाच वर्षांपासून अशा या शनि महाराजांची साडेसाती तुम्हाला सुरु आहे. आता ते जेव्हा राशी परिवर्तन करतील तेव्हा तुम्हाला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु होईल.

असे असले तरी इथे अजून एक विशेष बाब घडणार आहे. ती म्हणजे २९ एप्रिल रोजी शनि महाराज राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करतील आणि १२ जुलै रोजी वक्री होऊन पुन्हा मागील राशीत म्हणजे तुमच्या राशीत प्रवेश करतील. त्यानंतर ते १७ जानेवारी २०२३ रोजी मार्गी होऊन पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. तेथून मग खऱ्या अर्थाने तुम्हाला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु होईल. हा शेवटचा टप्पा आपल्याला त्रासाचा, संघर्षाचा जाईल ही जर तुमची भूमिका असेल, तशी भिती तुम्हाला वाटत असेल तर ती आधी तुम्ही मनातून काढून टाकली पाहिजे. कारण तुमच्या पहिल्या पाच वर्षांच्या वाटचालीवरुन, तुम्ही निभावलेल्या भूमिकेवरुन साडेसातीचा हा शेवटचा टप्पा तुम्हाला कसा राहिल? हे ठरणार आहे. तो कसा जाईल? याचा छोटासा ट्रेलर २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. शनि महाराजांच्या पुढील फळांची दिशा या काळात तुमच्या लक्षात येऊ शकते. #astrogurudrjyotijoshi

एकंदरीत पाहता शनि महाराज स्वत:च्या राशीला स्वत:चं घर म्हणून मान्यता देतात. मात्र न्याय करतांना, नियम लागू करतांना ते कोणतीही सूट देत नाहीत. एक बाब निश्चित घडते की शनि महाराजांची रास असल्यामुळे त्यांचे गुण तुमच्यात उतरलेले असतात. त्याचा एक प्रभाव तुमच्यात निश्चितपणे आलेला असतो. त्यामुळे न्यायाने वागणं, आपली कर्तव्ये पूर्ण करणं ही भावना तुमच्या मनात नेहमीच असते. तुम्ही त्या पद्धतीनेच वागतात. म्हणून शनि महाराज तुमच्या राशीला कमी त्रास देतात. आता आपण त्यांच्या ज्या गोचरचा अभ्यास करणार आहोत त्यानुसार शनि महाराज तुमच्या धन स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब, वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तिथे शनि महाराजांचीच कुंभ रास येते. जी त्यांची आवडती व मूळ त्रिकोण रास म्हणून ओळखली जाते.

थोडक्यात धन, कुटुंब, वाणीच्या स्थानात प्रवेश करणारे तुमचे राशी स्वामी अनेक अर्थाने तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. राशी स्वामी स्वत: जेव्हा धन स्थानात जातो तेव्हा धन लाभाच्या विविध संधी तो निर्माण करतो. कुटुंबात वृद्धी होणं, वाणीमध्ये प्रगल्भता येणं यासारखे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील. थोडक्यात शनि महाराज तुमच्या द्वितीय स्थानाला समृद्ध करणार आहेत. या स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींचा तुम्हाला भररुन लाभ प्राप्त होणार आहे.

यानंतर आपण शनि महाराजांच्या दृष्ट्यांचा प्रभाव समजून घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की, त्यांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. म्हणजे पत्रिकेतील दोन स्थानांचं स्वामीत्व आणि अन्य तीन स्थानांवर पडणारी त्यांची दृष्टी अशा एकूण पाच स्थानांना शनि महाराज एकाच वेळी प्रभावित करतात. त्यानुसार द्वितीय स्थानातील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती या गोष्टी बघितल्या जातात. या स्थानावर पडणाऱ्या शनि महाराजांच्या दृष्टीमुळे तुमच्यासाठी वास्तुचे, वाहनाचे शुभ योग निर्माण होतील. असलेल्या वास्तुत तुम्ही नूतनीकरणाचं काम करु शकता. त्यावर खर्च करु शकता. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहिल. म्हणून जे जातक वास्तुच्या नूतनीकरणाचा विचार करीत असतील त्यांनी या शुभ काळाचा पुरपुर उपयोग करुन घ्यावा. #astrogurudrjyotijoshi

यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्षाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच सासर व अचानक प्राप्त होणारा धनलाभही याच स्थानावरुन बघितला जातो. या स्थानावर पडणाऱ्या शनि महाराजांच्या दृष्टीमुळे सासरच्या लोकांशी तुमचं नातं अधिक समृद्ध होईल. मात्र येथे शनिच्या आदर्श शत्रुची म्हणजे मंगळाची रास येते. त्याचा कुठेतरी दुष्प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. म्हणजे काही बाबतीत सासरच्या मंडळीकडून थोडा त्रास होणं, यासारखा भाग समोर येऊ शकतो. असं असलं तरी धन स्थानातील शनि महाराजांच्या दृष्टीमुळे प्रॉपर्टीतून, कौटुंबिक लाभ असे शुभ प्रभाव देखील तुम्हाला मिळणारच आहेत.

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या एकादश स्थानावर पडेल. पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणारी शनि महाराजांची दृष्टी मकर राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण पत्रिकेत जेव्हा आपण अर्थ स्थान म्हणून पाहतो तेव्हा द्वितीय हे धन, कुटुंब, वाणी यांचं स्थान आणि एकादश हे लाभ व इच्छापूर्तीचं स्थान समोर येतं. २१व्या शतकात जेव्हा आपण इच्छापूर्ती हा शब्द वापरतो तेव्हा तो आर्थिक बाबींशी संबंधित असतो. आर्थिक बाबतीत नफा झाला, आर्थिक सुबत्ता मिळाली तर आम्ही बाकी गोष्टी करुन घेऊ, अशी काहीशी भूमिका प्रत्येकाचीच असते. त्यामुळेच इच्छापूर्ती म्हणजे धनलाभ असं मानलं जातं. म्हणूनच धनलाभाचं स्थान म्हणून एकादश स्थानाचं नाव पडलेलं आहे. या सर्व दृष्टीने विचार केला असता धनलाभाच्या संधी निर्माण होणं, इच्छापूर्ती घडून येणं यासारखे शुभ परिणाम शनि महाराजांच्या या गोचर मधून तुम्हाला प्राप्त होणार आहेत.

अर्थात हे परिणाम फक्त २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात प्राप्त होतील. कारण त्यानंतर शनि महाराज वक्री होऊन पुन्हा एकदा तुमच्या राशीत प्रवेश करतील. तेथून त्यांच्या प्रभावाची दिशा बदलेल. एखादा ग्रह वक्री होऊन जेव्हा पुन्हा मागच्या राशीत येतो, तेव्हा त्यामागील अर्थ असा असतो की मागे आपलं काहीतरी काम अपूर्ण राहिलं आहे, हे त्याला आठवतं. ते पूर्ण करण्यासाठी तो मागील राशीत प्रवेश करतो. किंबहूना ब्रम्हदेवांनीच त्याला पाठविलेलं असतं की, बाबा रे तू हे काम पूर्ण केलं नाहीस आणि घाईघाईत तू पुढे निघुन आलास. खरं तर शनि महाराज मंद ग्रह आहेत. प्रत्येक काम ते अत्यंत शांतपणे करतात. तरीही त्यांची काही कामं जी अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी ते वक्री अवस्थेत पुन्हा तुमच्या राशीत प्रवेश करतील. १७ जानेवारी २०२३ पर्यंत त्यांचा मुक्काम तुमच्या राशीतच राहिल. त्यानंतर ते पुन्हा तुमच्या धन स्थानात प्रवेश करतील. आता त्यांच्या फळांचा जो छोटासा ट्रेलर तुम्ही अनुभवणार आहात, तो चित्रपट तेथून पुढे सुरु होईल. अशा पद्धतीने शनि महाराजांच्या या गोचरची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. #drjyotijoshi

या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात मकर जातकांनी महादेवाला गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण करावे. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील.

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन मकर राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *