Skip to content
Home » शनि परिवर्तन – कुंभ रास

शनि परिवर्तन – कुंभ रास

शनि परिवर्तन – कुंभ रास

स्थिती उचित कर्मांची

कृपा शनि महाराजांची

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या कुंभ राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astrogurudrjyotijoshi

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

शनि महाराजांच्या या सर्व बाबी समजून घेतांना आपल्याला एक अजून बाब समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे मकर आणि आणि कुंभ या दोन्ही शनि महाराजांच्याच राशी आहेत. म्हणजे शनि महाराजांचं संपूर्ण गोचर हे स्वराशीतून आहे. २०२२ मध्ये ते आता धनिष्ठा नक्षत्रातूनच प्रवास करणार आहेत. कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण येतात आणि मकर राशीत दोन चरण येतात. म्हणजे राशीत परिवर्तन करुन ते जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा धनिष्ठा नक्षत्रात जातील. तसेच वक्री होऊन जेव्हा ते पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील तेव्हाही ते धनिष्ठा नक्षत्रातच असतील. थोडक्यात त्याचं नक्षत्र एकच असेल. मात्र प्रभावाची दिशा प्रचंड बदलेली राहिल. ती दिशा समजून घेण्यासाठी आपल्याला मकर आणि कुंभ या दोन राशींमधील मुलभूत फरक समजून घ्यावा लागेल. या दोन्ही राशी शनि महाराजांच्याच आहेत. मात्र आपण एक आवडती आणि एक नावडती रास म्हणू शकतो. त्यानुसार विचार केला असता कुंभ ही त्यांची आवडती रास आहे आणि मकर ही त्यांची नावडती रास आपण म्हणू शकतो. कारण मकर ही श्रमीक स्थिर रास आहे. निसर्ग कुंडलीत ती कर्म स्थानात येते. परिश्रम करणं, सातत्याने कार्यरत राहणं, सतत कर्म करीत राहणं, स्थिर राहणं हे तिचं मुलभूत तत्त्व आहे.

याऊलट कुंभ राशीच्या विचार केला असता ती वायुतत्त्वाची, बुद्धिमान, लाभ देणारी रास म्हणून ओळखली जाते. कारण निसर्ग कुंडलीत दशम स्थान हे कर्म स्थान आणि एकादश स्थान हे लाभ स्थान असतं. दहावी मकर रास ही कर्म रास आणि अकरावी कुंभ रास ही इच्छापूर्ती करुन देणारी, लाभ करुन देणारी रास असते. म्हणजे मूळत: या दोन राशींमध्ये खूप मोठा फरक असून त्यातील कुंभ रास ही शनि महाराजांची आवडती रास आहे. नैसर्गिकरीत्या लाभ स्थान, एकादश स्थान, उपचय स्थान या सर्व दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाप ग्रहांना उपचय स्थान आवडतं. म्हणून देखील शनि महाराजांना हे उपयच स्थान विशेष मानवतं. साहजिकच त्याची अत्यंत शुभ फळं सर्व राशींना प्राप्त होतील.

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते. #astrogurudrjyotijoshi

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा हा थोडासा खर्चिक, निराशा उत्पन्न करणारा ठरतो. तिथे शनि महाराजांचीच रास असली तरी मकर आणि कुंभ या राशींमध्ये मूळ खूप मोठा फरक असल्यामुळे पहिला टप्पा निराशा निर्माण करतो. दुसरा टप्पा जातकाच्या बुद्धिमत्तेत वाढ करणारा ठरतो. विचार प्रगल्भ बनवितो. कर्तव्य पूर्ण करण्याची वृत्ती वाढवितो. एकंदरीत या टप्प्यापासून जातकांची मोठ्या प्रमाणात प्रगती सुरु होते. कारण या काळात त्यांच्या पत्रिकेत शश योग देखील घडून आलेला असतो. जो अत्यंत महत्त्वाचा व शुभ राजयोग मानला जातो. मात्र तिसरा टप्पा पुन्हा संघर्षाचा जातो. या काळात कुंभ जातकांना बऱ्यापैकी संघर्ष करावा लागतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

      आता आपण तुमच्या कुंभ राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज आता राशी परिवर्तन करुन तुमच्या राशीतच प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे तुमच्या राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होईल. कुंभ रास ही खरं तर शनि महाराजांची स्वत:ची आवडती रास म्हणून ओळखली जाते. त्यामुळे निश्चितच तुम्हाला साडेसाती त्या तुलनेत त्रासदायक जात नाही. मात्र आपल्याला माहितीच आहे की, शनि महाराज हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधिश म्हणून ओळखले जातात. सर्वांसोबत समान न्याय करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्या पद्धतीचं त्यांचं कारकत्व आहे. त्याला अनुसरुन ते आपलं मूळ कारकत्व, स्वभाव कधीही सोडत नाहीत. दुसरीकडे तुमची कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार रास म्हणून ओळखली जाते. नाती जपणं, निभवणं तुमच्या राशीच्या लोकांना खूप उत्तम प्रकारे जमतं. शांत बसून प्रश्न सोडविण्याची कला तुम्हाला अवगत असते. त्या बळावरच कितीही विपरीत स्थिती निर्माण झाली तरी तुम्ही नाती जपण्यात यशस्वी होतात. आपली सर्व कर्तव्ये, जबाबदाऱ्या पूर्ण करतात. तुमची बौद्धिक भूमिका ही परिपूर्ण असते. म्हणून देखील कुंभ राशीला साडेसातीचा त्रास जास्त होत नाही.

शनि महाराजांची कार्य करण्याची एक विशिष्ट्य पद्धती आहे. ते सुरुवातीला अवलोकन करतात. प्रत्येक जातकाच्या कर्माकडे, भूमिकेकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. कोणता जातक कोणत्या पद्धतीने कार्य करतो आहे? काय बरोबर करतो आहे? कोणत्या चुका करतो आहे? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. त्याला अनुसरुनच ते तुम्हाला साडेसातीच्या काळात टप्प्या टप्प्याने तशी फळं देतात. त्याविषयी आपण आधीच सविस्तरपणे समजून घेतलं आहे. शनि महाराज तुमचे राशी स्वामी आहेत. त्याबरोबर द्वादश स्थानाचं स्वामीत्व देखील त्यांच्याकडेच आहे. सध्या ते तुमच्या द्वादश स्थानातच विराजमान आहेत. २९ एप्रिल रोजी ते राशी परिवर्तन करुन तुमच्या राशीत प्रवेश करतील. तेव्हा ते तुमच्यासाठी पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या शश योगाचे निर्माण करतील. जो अत्यंत महत्त्वाचा व प्रभावशाली राजयोग मानला जातो. त्याची भरभरुन शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील.

अर्थात एकीकडे शनि महाराज तुमच्या चंद्रावरुन गोचर करतील. चंद्र म्हणजे मन आणि शनि म्हणजे जबाबदारी होय. तुमच्या मनाला ते जबाबदारी घेणं शिकविण्याचा प्रयत्न करतात. त्याचा कदाचित तुम्हाला त्रासही होऊ शकतो. मात्र त्याच वेळी ते तुम्हाला अत्यंत शुभ व राजयोगकारक शुभ फळं देखील प्रदान करतात. थोडक्यात जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ते तुम्हाला बळ प्रदान करतात, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या काळात तुम्ही केवळ आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त न्यायाने वागलं पाहिजे. असे केलेल्या शनि महाराज तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरुन शुभ फळं प्रदान करतील. त्यामुळे साडेसाती आली आणि प्रगती देऊन गेली, असं देखील तुमच्या बाबतीत होऊ शकतं. म्हणून साडेसातीविषयीच्या कोणत्याही गैरसमजूती तुमच्या मनात असतील, भिती असेल तर ती सर्वप्रथम काढून टाका. आपले काम प्रामाणिकपणे करीत राहा. कर्तव्ये, जबाबदाऱ्या पूर्ण करा. असे केल्यास शनि महाराज तुम्हाला शुभ फळं देण्यासाठी निश्चितच बाध्य होतील.

या काळात शनि महाराजांच्या कृपेने तुमचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रगल्भ व समृद्ध होणार आहे. बुद्धिमान तुम्ही आहातच. अधिक विचारपूर्वक वागणूक तुमची सुरु होईल. कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करुन त्याला कार्याला हात लावण्याची प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल. कारण शनि महाराज तुमच्या राशीत, तुमच्या पत्रिकेच्या प्रथम स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकाचं स्वत:चं स्थान असतं. त्यावरुन एकूणच व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा बोध होत असतो. थोडक्यात शनि महाराजाचं हे गोचर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला समृद्ध करणार आहेत. #astroguruma

आपल्याला माहितीच आहे की शनि महाराजांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. म्हणजे पत्रिकेतील दोन स्थानांचं स्वामीत्व आणि तीन स्थानांवर पडणारी त्यांची दृष्टी अशा एकूण पाच स्थानांवर त्यांचा एकाचवेळी प्रभाव पडतो. त्यानुसार राशीतील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थानावरुन पराक्रम, परिश्रम, बंधुसौख्य, शेजारी, लहान-मोठे प्रवास या गोेष्टी बघितल्या जातात. या स्थानावर पडणाऱ्या शनि महाराजांच्या दृष्टीमुळे तृतीय स्थानाची अत्यंत शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील. या काळात तुम्ही लहान-मोठे अनेक प्रवास कराल. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. भावंडांसोबत तुमचं नातं अधिक समृद्ध होईल. किंबहूना शेजार्‍यांशी देखील सौख्य निर्माण होईल. तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा प्राप्त होईल. थोडक्यात तृतीय स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील.

यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान मानलं जातं. या दोन्ही बाबतीत शनि महाराज तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्रदान करतील. त्याचा परिणाम म्हणजे वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यात योग्य तो सुसंवाद, एकवाक्यता निर्माण होईल. तुम्ही दोघं मिळून एका दिशेने निर्णय घ्याल. त्याचा शुभ परिणाम तुमच्या संसारावर होईल. थोडक्यात तुमच्या वैवाहिक जीवनाला समृद्ध करणारा हा काळ असेल. जे जातक भागिदारी व्यवसाय करीत असतील त्यांच्यासाठी देखील हा काळ लाभदायक म्हणता येईल. व्यावसायिक भागिदार आणि तुमचे विचार जुळतील. एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती वाढेल. कोणताही निर्णय तुम्ही एकमताने घ्याल. त्यातून तुमच्या व्यवसायाची उन्नती घडून येईल. म्हणजे वैवाहिक जीवन आणि व्यवसाय या दोन्ही दोन्ही दृष्टीने शनि महाराज तुम्हाला उत्तम फळं प्रदान करणार आहेत. त्याचा तुम्ही पुरेपुर लाभ घ्यायला हवा. #astrogurudrjyotijoshi

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्म स्थान असं म्हटलं जातं. व्यावसायिक उन्नती देखील याच स्थानावरुन बघितली जाते. तसेच निसर्ग कुंडली बघितली असता या स्थानाचं नैसर्गिक स्वामीत्व देखील शनि महाराजांकडे आहे. त्यामुळे दशम स्थानावर पडणारी त्यांची दृष्टी तुमच्या कर्माच्या दृष्टीने, कर्तृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरेल. अनेक सुसंधी त्यातून तुम्हाला प्राप्त होतील. अर्थात यावेळी मूळ पत्रिकेतील शनि महाराजांची स्थिती बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण गोचर म्हणजे मूळ पत्रिकेत असलेली घटना घडून येण्याचा मार्ग होय. गोचरनुसार घटनेचा मार्ग आपण शोधतो. मात्र घटना ही मूळ पत्रिकेतच दडलेली असते. म्हणजे मूळ कुंडलीत जर शनि महाराज शुभ असतील तर त्यांच्या आताच्या स्थितीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. त्यामुळे आपली मूळ कुंडली तुम्ही अवश्य बघावी. बुधा, शुक्राच्या किंवा शनिच्या राशीतील शनि महाराज शुभ ठरतात. तसेच तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश ही स्थानं त्यांना विशेषत्वाने मानवतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची स्थिती तुम्ही बघावी. म्हणजे त्यांच्या फळांची दिशा तुमच्या लक्षात येईल.

अर्थात हे सर्व शुभ परिणाम तुम्हाला २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात प्राप्त होतील. कारण त्यानंतर शनि महाराज वक्री होऊन पुन्हा मागील राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतील. १७ जानेवारी २०२३ रोजी ते मार्गी होऊन पुन्हा तुमच्या राशीत प्रवेश करतील. तेव्हा त्यांची जी फळे तुम्हाला प्राप्त होतील त्याचा छोटासा ट्रेलर आताच्या काळात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. १२ जुलै रोजी शनि महाराज व्रकी होऊन मकर राशीत म्हणजे तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करतील. कोणताही ग्रह वक्री होऊन जेव्हा मागील राशीत जातो तेव्हा तो तिथे राहिलेली आपली अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी जातो. त्यानुसार शनि महाराज तुमच्या व्यय स्थानात जाऊन काही दिवस तुम्हाला व्यय स्थानाचे प्रभाव देतील. तेथून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर, सप्तम दृष्टी षष्ठ स्थानावर आणि दशम दृष्टी भाग्य स्थानावर पडेल. त्यानुसार त्या दृष्टींची फळं देखील तुम्हाला प्राप्त होतील.

जानेवारी २०२३ मध्ये शनि महाराज वक्री होऊन पुन्हा एकदा तुमच्या राशीत प्रवेश करतील. तेव्हापासून तुम्हाला खऱ्या अर्थाने शश या राजयोगाची शुभ फळं प्राप्त व्हायला सुरुवात होईल. या काळात तुम्ही केवळ आपल्या कर्तव्यांकडे, जबाबदार्‍यांकडे, कर्माकडे लक्ष द्यायला हवं. कारण शनि महाराज तुम्हाला अजून पुढील पाच वर्ष शुभ फळं देणार आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्वार्थाने लाभ होणं, रंकाचा राव होणं ही घटना या काळात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही पुरेपुर प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या या शुभ स्थितीचा पुरेपुर लाभ घ्यायला हवा.

या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात कुंभ जातकांनी शिवसहस्त्रनामासह महादेवाला तुपाचा अभिषेक करावा. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astroguruma

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *