Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – मिथुन रास

राहु-केतु परिवर्तन – मिथुन रास

 

सुरुवात संघर्षातून मुक्तीची

नांदी उज्ज्वल भविष्याची…

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही. #bestastrologerinmaharashtra

थोडक्यात राहु आणि केतु या दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंधित असले तरी ते दोन्ही भिन्न टोकांना असतात. त्यामुळे त्यांचे प्रभावही एकमेकांच्या विरुद्ध असतात. राहुला आपण काळ पुरुषाचं दु:ख म्हणू शकतो. तो छाया ग्रह आहे. सूड घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात आहे. दारुसह इतरही वाईट प्रवृत्तीचा कारक म्हणूनही त्याला ओळखलं जातं. घात, चोरी, अपघात, दरोडा, माणसाला विस्थापित करणं हे सर्व कारकत्व मानलं जातं. मात्र यामुळे राहु पूर्णपण वाईट होत नाही. त्याच्याकडे काही चांगल्या बाबी देखील येतात. राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे.

केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. आध्यात्म्याच्या कारक ग्रह खरं तर तीन आहे. शनि, गुरु आणि केतु हे तीन ग्रह होय. मात्र या तिघांच्या कारकत्वात एक मुलभूत फरक आढळून येतो. तो म्हणजे शनि महाराज जातकाला सांगतात कि, नीतीने, न्यायाने वागा आणि मोक्षाकडे जा. गुरु महाराज जातकाला सांगतात की आधी सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मोक्षाकडे चला. तर केतु जातकाला सांगतो की सर्व काही सोडून द्या आणि मोक्षाकडे चला. अर्थात, केतु हा ग्रह कुठेतरी जबाबदारी नाकारणारा ग्रह आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचा प्रभाव भयंकर असतो. तो पत्रिकेत ज्या स्थानात बसतो त्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचं काम करतो. ज्या ग्रहासोबत तो बसलेला असतो त्याचं कारकत्व खराब करण्याचं काम तो करीत असतो. तसेच ज्या स्थानावर त्याची दृष्टी असते त्या नात्यात तो दरी निर्माण करतो. मनुष्याला विरक्ती येते ती केतु या ग्रहामुळेच येते. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा मिथुन राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया. #astroguruma

      राहु आणि केतुचं हे राशी परिवर्तन मिथुन जातकांसाठी अत्यंत लाभदायक राहिल. कारण या परिवर्तनात राहु हा ग्रह तुमच्या लाभ स्थान म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात प्रवेश करेल. लाभ स्थानात येणाऱ्या प्रत्येक ग्रहाने जातकाला शुभ फळे द्यावीत, ही सूचना ब्रम्हदेवाने सर्व ग्रहांना केलेली असते. त्यानुसार लाभ स्थानात येणारा प्रत्येक ग्रह जातकाला शुभ फळे द्यायला बाध्य ठरत असतो. विशेषत: जी पाप ग्रह असतात, म्हणजे शनि, मंगळ, राहु व केतु ही ग्रह तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश या चार स्थानांमध्ये अत्यंत देतात. कारण या चारही स्थानांना उपचय स्थान म्हणून ओळखले जाते आणि अशी ही उपचय स्थान पाप ग्रहांना विशेषत्वाने मानवतात. तिथे त्यांच्या अशुभ फळांची, त्रासाची तीव्रता कमी होते. तसेच त्या स्थानाच्या कारकत्वाने वाढ होत असते. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबतच ते उपयच स्थान देखील आहे. मिथुन पत्रिकेला लाभ स्थान मंगळाची मेष रास येते. अशा या मेष राशीत राहु ग्रहाचं गोचरीने पुढील दीड वर्षांसाठी आगमन होणार आहे. जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मग त्यात आर्थिक लाभ होणं किंवा इच्छापूर्ती होणं, या सारखे परिणाम तुम्हाला विशेषत्वाने प्राप्त होणार आहे. गेली अनेक दिवस जी इच्छा तुम्ही मनात बाळगूण होतात. मात्र काही केल्या ती गोष्ट घडून येत नव्हती. ती गोष्ट अचानकपणे घडून येणे. सुप्त इच्छांची पूर्तता होणं, यासारख्या अनेक बाबतीत अत्यंत लाभदायक असा हा काळ तुमच्यासाठी असणार आहे.

विशेषत: या काळात इतर ग्रहांकडूनही तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. म्हणजे १२ एप्रिल रोजी राहु आणि केतु यांचं राशी परिर्वतन घडून येईल. १३ एप्रिल रोजी गुरु महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि २९ एप्रिल रोजी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. त्यांच्यापासूनचही तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होणार आहेत. त्यांचेही प्रभाव आपण पुढे राशीनुसार सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. आता आपण राहु आणि केतु यांच्या परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. तर इच्छापूर्तीच्या स्थानात येणारा राहु हा एकाच वेळी शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे परिणाम देत असतो. कारण स्थानासह त्याच्या दृष्टीचेही प्रभाव असतात. राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन द़ृष्ट्या असतात. त्यांचाही खूप मोठा प्रभाव पत्रिकेवर, जातकावर निश्चितपणे पडत असतो.

त्यानुसार राहुच्या दृष्ट्यांचा विचार केला असता त्याची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर म्हणजे पराक्रम, परिश्रमाच्या स्थानावर पडेल. जी तुमच्या परिश्रमात, पराक्रमात, प्रवासात वाढ करणारी ठरेल. म्हणजे या काळात तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी, अपेक्षित लाभ प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रवास कराल. प्रचंड परिश्रम कराल आणि त्यात यशस्वी होण्याच्या संधी देखील राहु तुमच्यासाठी निर्माण करणार आहेत. मेष राशीतच हर्षल ग्रह देखील विराजमान आहे. त्याचाही प्रभाव तुमच्यावर निश्चितपणे पडणार आहे. विशेष म्हणजे तुमचे भाग्येश शनि महाराज हे २९ एप्रिल रोजी तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. तसेच दशमेश असलेले गुरु महाराज १३ एप्रिल रोजी दशम स्थानात प्रवेश करणार आहेत. थोडक्यात तुमच्या पत्रिकेतील भाग्य, कर्म आणि लाभ ही तीनही स्थानं कार्यान्वित होणार आहेत. त्याची अत्यंत शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील. किंबहूना राहु-केतुचं हे परिवर्तन सर्व राशींमध्ये कुणासाठी जास्त शुभ असेल तर ती मिथुन राशी सांगता येईल. #astrogurudrjyotijoshi

      अर्थात, शुभ परिणाम असले तरी शेवटी तो राहु ग्रह आहे. त्याचे काही अशुभ परिणामही तुमच्यावर नक्कीच होणार आहेत. राहुची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. जी कुठेतरी शिक्षणात व्यत्यय येणं किंवा संततीच्या संदर्भात प्रश्न निर्माण करण्याचं काम करेल. याशिवाय राहुची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडणार आहे. ज्याद्वारे तुमच्या घरात विसंवाद निर्माण होऊ शकतात. याचवेळी तुमच्या पंचम स्थानात आलेला केतु देखील तुमच्या शिक्षणात बऱ्यापैकी समस्या निर्माण करण्याचं काम करु शकतो. परिणामी जे जातक शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठ्या संघर्षाचा हा कालखंड राहिल. मात्र जे जातक संशोधनात्मक शिक्षण घेत असतील तर पंचमातील केतु तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरेल. कारण केतुच्या कारकत्वात संशोधन आणि आध्यात्म या गोष्टी येतात. इतर बाबतीत केतुंच हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र या बाबतीत त्याची शुभ फळे तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील. त्यामुळे जे जातक संशोधनात्मक अभ्यास करीत आहेत त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल.

ज्यावेळी आपण बारा राशींचा आणि राहु-केतुच्या या गोचरचा विचार करतो तेव्हा सर्व राशींमध्ये मिथुन ही अत्यंत भाग्यवान रास ठरणार आहे. तसंही गत तीन – चार वर्षांमध्ये मिथुन राशींच्या जातकांनी सर्वात जास्त संघर्ष केलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त शुभ फळं प्राप्त करण्याचा अधिकार देखील त्यांचाच आहे. तो अधिकार त्यांना आता प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांनी या लाभदायक, प्रगतीदायक काळाचं स्वागत करण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी सज्ज राहायला हवं.

राहु-केतु परिवर्तनाचे मिथुन राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद! शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *