Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – मेष रास

राहु-केतु परिवर्तन – मेष रास

  • by

राहु-केतु परिवर्तन – मेष रास

 

थांबवा अहंकाराला

सांभाळा परिवाराला

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

ज्योतिषीय दृष्टिकोनातून येणारा एप्रिल हा सर्वांसाठीच विशेषत्वाने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात जवळपास सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. अशा घटना सहसा इतिहासात लवकर आढळून येत नाहीत. याला आपण युग परिवर्तन असं म्हटलं तरी अजिबात अतिशोयोक्ती ठरणार नाही. कारण हे परिवर्तन म्हणजे येणाऱ्या खूप मोठ्या बदलांची पूर्वपिठीका ठरणार आहेत. एकाच महिन्यात सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन ही खूप मोठी घटना ठरणार आहे. हा महिना म्हणजे एप्रिल महिना होय. त्यात सर्वप्रथम राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन घडून येणार आहे. राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. #astrogurudrjyotijoshi

ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन्हीही छाया ग्रह आहेत. म्हणजे ते एक प्रकारे बिंदू आहेत. खरं तर ते ग्रह नाहीत. तरी मनुष्य जीवनावर त्यांच्या खूप मोठा प्रभाव दिसून येतो. इतका की सर्व ग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य या दोन ग्रहांमध्ये आहे. २१ व्या शतकात राहु आणि केतु या दोघांचं विशेषत्वाने महत्त्व समोर येतं. कारण या शतकात प्रामुख्याने जी क्रांती घडून आली आहे, म्हणजे विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मीडियाची विविध माध्यमं, टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेश या सर्व गोष्टी राहुच्या अखत्यारीत येतात. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास राहु म्हणजे अटॅचमेंट आणि केतु म्हणजे डिटॅचमेंट होय. राहु म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती कोणत्याही परिस्थितीत मिळवणं होय. कसंही करुन ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे, ही भावना म्हणजे राहु ग्रह होय. तसेच जे आहे, जसं आहे त्याला तसंच्या तसं स्विकारायचं आणि वाटचाल करत राहायची, ही भावना म्हणजे केतु होय. कारण केतु हा ग्रह मुक्ती, मोक्षाचा, विरक्तीचा कारक ग्रह मानला जातो. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुनच बघितली जाते. त्यामुळे त्याचा प्रभाव हा राहुच्या अगदी विरुद्ध असतो.

एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा मेष राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

राहु आणि केतु यांच्या प्रभावांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याचा कालावधी हा जवळपास दीड वर्षांचा असतो. मग हे संपूर्ण दीड वर्ष त्यांचा प्रभाव एकसारखा असतो का? तर असं होत नाही. त्यातही त्या दोघांच्या बदलणाऱ्या अंशाप्रमाणे, नक्षत्राप्रमाणे प्रभावाची दिशा बदलत असते. मात्र आता आपण राशीनुसार जेव्हा प्रभाव सांगतो एक सामान्य प्रभाव सांगत असतो की दीड वर्ष या राशीच्या जातकांवर या पद्धतीने प्रभाव पडेल. त्यात मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता राहुचं आगमन हे मेष राशीतच होत आहे. आता मेष राशीचा स्वामी मंगळ आणि राहु या दोन्ही ग्रहांमध्ये एक नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे. मंगळ म्हणजे धडाडी, कर्तबगारी होय. आता त्याच्या स्थानात राहु येणार आहे की ज्याला प्रत्येक गोष्ट हवी असते. राहुला एखादी गोष्ट खूप उत्कटपणे पाहिजे असते. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. मूळात मंगळ म्हणजे धडाडी, आक्रमकता होय. त्याच्या राशीत आता राहुचं आगमन होतंय. म्हणजे मेष जातकांच्या मूळ स्वभावात कुठेतरी एक अतिरेक यामुळे घडून येणार आहे. कोणतीही गोष्ट काहीही करुन मिळविणं, ही भूमिका जातकाची तयार होते. त्यामुळे अर्थातच, ईगो वाढीस लागतो. राहुचा प्रभाव तुमच्या डोक्यावर होणार आहे. कारण मेष राशीचा अंमल हा प्रामुख्याने डोक्यावर असतो. राहुच्या आगमनामुळे कुठेतरी तुमच्या विचार शक्तीची दिशा बदलणार आहे. थोडासा अंहकार वाढीस लागेल. थोडीशी नकारात्मकता तयार होईल. #drjyotijoshi

अर्थात, सगळेच नकारात्मक परिणाम होतील का? तर नाही, काही सकारात्मक परिणामही प्रामुख्याने समोर येतील. या काळात तुमच्या कर्तृत्वात, कर्तृबगारीत वाढ होणार आहे. मात्र कर्तृत्व करीत असतांना कुठेतरी आनंदानेही जगायचं असतं ही बाब तुम्ही विसराला. विशेषत: २९ एप्रिल रोजी शनि महाराज जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा राहु आणि शनि यांच्यात लाभ योग तयार होईल. मधल्या काळात म्हणजे १३ एप्रिल रोजी गुरु महाराज मीन राशीत प्रवेश करतील. म्हणजे गुरु ग्रह राहु आणि शनिच्या कैचीत सापडणार आहे. या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. परिणामांच्या दृष्टीने विचार केला तर एकीकडे अहंकार वाढेल. कारण राहु तुमच्या राशीत आलेला आहे. तुमचा कर्मेश आणि लाभेश शनि लाभ स्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात येणार आहे. जेथून तो अत्यंत शुभ फळं तुम्हाला देणार आहे. त्याचवेळी भाग्येश राहु आणि शनि म्हणजे राशी आणि लाभ स्थान यांच्या कैचीत आल्यामुळे भाग्यात उणिव तयार होईल. या सगळ्यातून मार्गक्रमण करायचं आहे.

खरं तर एप्रिल महिन्यात सर्वच ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. एकाच महिन्यात हे सर्व घडणार असल्यामुळे त्या सर्वांचा प्रभाव आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देऊ शकत नाही. तरी सुद्धा आपण ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांसाठी राहु-केतु, गुरु आणि शनि महाराज यांच्या परिवर्तनाचे स्वतंत्र व्हिडिओ देणार आहोत. या ग्रहांच्या तुमच्या राशीवर पडणाऱ्या परिणामांचं विश्लेषण आपण सविस्तरपणे करणार आहोत. त्यानुसार मेष राशीचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे प्रथम स्थानात म्हणजे डोक्यावर राहुचं आगमन होणार आहे. तसेच सप्तमात केतुचं आगमन होणार आहे. येथे मूळत: एक विरोधाभास निर्माण होत आहे. डोक्यावर होणारं राहुचं आगमन हे कुठेतरी अहंकारात वाढ करेल आणि केतुची सप्तमातील उपस्थिती ही जोडीदाराशी दुरावा निर्माण करण्याचं काम करेल. कारण राहु हा ग्रह अटॅच करतो तर केतु हा ग्रह डिटॅच करण्याचं काम करतो. त्यानुसार येथे केतु जोडीदाराशी दुरावा निर्माण करण्याचं काम करु शकतो. जोडीदराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, ही प्रवृत्ती यातून निर्माण होते. त्यामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात.

      दृष्टीची विचार केला असता प्रथम स्थानातील राहुची पंचम दृष्टी पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघत असतो. या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी ही नकारात्मक प्रभाव देणारी असेल. पंचम स्थानात सिंह रास येते. सिंह राशीचा स्वामी रवि आणि राहु यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. त्यामुळे देखील नकारात्मक प्रभावात येथे वाढ दिसून येते. या काळात संततीची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक असेल. जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होणं, विलंब होणं या सारखे प्रभाव प्रामुख्याने दिसून येतील. यानंतर राहुची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर असेल. जी विशेषत्वाने काळजी घ्यावयास लावणारी आहे. कारण ही दृष्टी जोडीदारासोबत विसंवाद निर्माण करण्याचं काम करते. विघटन हे राहुचं मुख्य कारकत्व आहे. तुमच्यात आणि जोडीदारामध्ये मानसिक दुरावा निर्माण होतो. कारण एकीकडे तुमचा स्वत:चा अहंकार वाढलेला असतो आणि दुसरीकडे तुम्ही जोडीदाराकडे दुर्लक्ष करीत असता. याचा प्रभाव म्हणजे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. राहुची नवम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर म्हणजे भाग्य स्थानावर पडणार आहे. तुमचे भाग्येश गुरु महाराज १३ एप्रिल रोजी राशी परिवर्तन करुन व्यय स्थानात येणार आहेत. या दृष्टीचा प्रभाव म्हणजे तुमच्या प्रवासात वाढ होईल. हॉस्पिटलचे खर्च वाढतील. विविध कारणांनी घरापासून खूप लांब जाण्याचे योग निर्माण होणं. एखाद्या स्थानावर तुम्ही अनेक वर्ष स्थिरावलेले असतात. ते स्थान सोडून तुम्हाला दूर कुठेतरी जावं लागणं, असे प्रभाव प्रामुख्याने समोर येतील. #rahuketuparivartan

याच वेळी केतु महाराज तुमच्या सप्तम स्थानात विराजमान असतील. त्यामुळे जोडीदार तुम्हाला दुरावल्या सारखा वाटेल. कारण केतु हा ग्रह विरक्ती देण्याचं काम करतो. आध्यात्मिकता देतो, सांसारिक नकारात्मकता देतो. त्यामुळे जोडीदार तुमच्याशी पहिल्या सारखं मनमोकळेपणाने बोलायला येणार नाही. तुमच्याकडे पुरेसं लक्ष देणार नाही. अर्थात, ही फक्त तुमची भावनाच असणार आहे. जी या काळात वाढीस लागेल. परिणामी दुरावा अजून जास्त वाढू शकतो. त्यामुळे या काळात मेष जातकांनी प्रामुख्याने आपलं कुटुंब सांभाळण्याची नितांत गरज आहे. इतर ग्रहांचे बरेच शुभ परिणाम होणार असले तरी तुमच्या राशीत आणि लग्न स्थानात आलेला राहु हा कुठेतरी तुमच्या सांसारीक जीवनावर मोठा नकारात्मक प्रभाव टाकत असतो. कारण तुमचा स्वभाव हा मूळत: आक्रमक आहे. अग्रेसिव्ह आहे. धडाकडेबाज आहे त्यात राहुचं आगमन हे बऱ्यापैकी नकारात्मकता निर्मार करण्याचं काम करेल. #astrogurudrjyotijoshi

      सप्तम स्थानातील केतुची दृष्टी ही तुमच्या राशीवर पडणार आहे. जी कुठेतरी तुमच्यात नैराश्य निर्माण करण्याचं काम करेल. म्हणजे परस्पर विरुद्ध परिणाम येथे निर्माण होतात. एकीकडे आक्रमता तर मध्येच येणारं नैराश्य, या सर्व संघर्षातून वाटचाल करीत तुम्हाला पुढे जायचं आहे. असं असलं तरी याच काळात शनि महाराज तुम्हाला प्रचंड सहकार्य करणार आहेत. २९ एप्रिल रोजी ते राशी परिवर्तन करुन तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करतील. शनि आणि राहु हे आपसात मित्र ग्रह आहेत. त्याचे देखील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात सांगायचे झाल्यास या काळात तुम्हाला आपला मूळ स्वभाव, आपलं कुटुंब, जोडीदार यांना सांभाळायचं आहे. तेच तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील.

राहु-केतु परिवर्तनाचे मेष राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *