Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – कुंभ रास

राहु-केतु परिवर्तन – कुंभ रास

परिश्रमासह कर्मात वृद्धी

लाभासह होईल इच्छापूर्ती

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #drjyotijoshi

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही.

थोडक्यात राहु आणि केतु या दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंधित असले तरी ते दोन्ही भिन्न टोकांना असतात. त्यामुळे त्यांचे प्रभावही एकमेकांच्या विरुद्ध असतात. राहुला आपण काळ पुरुषाचं दु:ख म्हणू शकतो. तो छाया ग्रह आहे. सूड घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात आहे. दारुसह इतरही वाईट प्रवृत्तीचा कारक म्हणूनही त्याला ओळखलं जातं. घात, चोरी, अपघात, दरोडा, माणसाला विस्थापित करणं हे सर्व कारकत्व मानलं जातं. मात्र यामुळे राहु पूर्णपण वाईट होत नाही. त्याच्याकडे काही चांगल्या बाबी देखील येतात. राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे. #drjyotijoshi

केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. आध्यात्म्याच्या कारक ग्रह खरं तर तीन आहे. शनि, गुरु आणि केतु हे तीन ग्रह होय. मात्र या तिघांच्या कारकत्वात एक मुलभूत फरक आढळून येतो. तो म्हणजे शनि महाराज जातकाला सांगतात कि, नीतीने, न्यायाने वागा आणि मोक्षाकडे जा. गुरु महाराज जातकाला सांगतात की आधी सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मोक्षाकडे चला. तर केतु जातकाला सांगतो की सर्व काही सोडून द्या आणि मोक्षाकडे चला. अर्थात, केतु हा ग्रह कुठेतरी जबाबदारी नाकारणारा ग्रह आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचा प्रभाव भयंकर असतो. तो पत्रिकेत ज्या स्थानात बसतो त्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचं काम करतो. ज्या ग्रहासोबत तो बसलेला असतो त्याचं कारकत्व खराब करण्याचं काम तो करीत असतो. तसेच ज्या स्थानावर त्याची दृष्टी असते त्या नात्यात तो दरी निर्माण करतो. मनुष्याला विरक्ती येते ती केतु या ग्रहामुळेच येते. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा कुंभ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

राशी चक्रातील सर्व राशींमध्ये राहु परिवर्तनाचे अत्यंत शुभ परिणाम कोणत्या राशीला प्राप्त होणार असतील तर ती म्हणजे कुंभ रास होय. कारण कुंभ पत्रिकेच्या तृतीय स्थानात राहुचं आगमन होणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते राहुला विशेषत्वाने मानवतं. म्हणूनच त्याची अत्यंत शुभ फळं कुंभ जातकांना प्राप्त होतील. किंबहूना जगातील जेवढे नामवंत, कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेले आहेत, त्यातील अनेकांच्या पत्रिकेत राहु तृतीय स्थानात विराजमान असल्याचे आपल्याला आढळून येईल. कुंभ राशीचे स्वामी शनि महाराज आणि राहु यांच्यात मैत्रीचं नातं आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे १२ एप्रिल रोजी राहु तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करेल आणि २९ एप्रिल रोजी शनि महाराज देखील राशी परिवर्तन करुन तुमच्या राशीत प्रवेश करतील. तेथून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तृतीय स्थानातील राहुवर पडेल. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या लाभ योग निर्माण होईल. त्यामुळे देखील राहुची शुभता वृद्धिंगत होईल तुम्हाला त्यापासून अत्यंत शुभ फळांची प्राप्ती होणार आहे. तुमच्या राशी स्वामीच्या दृष्टीमुळे मूळत: शुभ असलेला राहु अजून अधिक शुभ फळं तुम्हाला प्रदान करेल. #rahu #ketu

      राहु हा १२ व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, राहु जेव्हा द्यायला बाध्य होतो तेव्हा तो भरभरुन देतो. त्याच पद्धतीने राहु कुंभ जातकांना भरभरुन शुभ फळ द्यायला बाध्य होणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यानुसार या स्थानात येणारा राहु तुमच्या कर्तृत्वात, कर्मात वाढ करणार आहे. त्यातुन तुम्हाला आर्थिक संपन्नता प्राप्त होईल. राहुच्या स्थानासोबत त्याची दृष्टी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यानुसार तृतीय स्थानातील राहुची पंचम दृष्टी सप्तम स्थानावर, सप्तम दृष्टी नवम म्हणजे भाग्य स्थानावर आणि नवम दृष्टी लाभ म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानावर पडेल. इच्छापूर्तीच्या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. म्हणजे मागील काळात तुम्ही ज्या ज्या इच्छा तुम्ही मनात धरल्या असतील किंवा काही सुप्त इच्छा ज्या तुमच्या अपूर्ण असतील त्या सर्वांच्या पूर्तीचा तो कालखंड असणार आहे. त्यामुळे हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जेव्हा काळ अनुकूल असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपले प्रयत्न वाढविणे गरजेचे असते. कारण त्या प्रयत्नांच्या यशस्वीतेची टक्केवारी ही जास्त असते. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही आपल्या सुप्त इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक राहिल. त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

थोडक्यात अनेक गोष्टीत यश प्राप्त करण्याचा हा काळ आहे आणि राहु तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरुन शुभ फळं द्यायला तत्पर राहणार आहे. तुम्हाला समृद्धतेकडे घेऊन जाणार आहे. सोबतच इतर दोन स्थानावर पडणाऱ्या दृष्टीचेही तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील. एकूण राहुचं हे गोचर कुंभ जातकांसाठी विविध दृष्टीने लाभदायक ठरणार असून तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात राशी स्वामी असलेले शनि महाराज राशीत, लाभेश असलेले व धनेश असलेले गुरु महाराज धन स्थानात आणि तृतीय स्थानात राहु ही ग्रहांची बैठक बसणार आहे, ती तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक, लाभदायक ठरेल. एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यानंतर जी एकूण संपूर्ण ग्रहांची बैठक असेल ती तुम्हाला प्रगतीकडे, उन्नतीकडे घेऊन जाणारी असेल.

केतु परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता त्याचं आगमन तुमच्या भाग्य स्थानात होणार आहे. तो मात्र तुमच्या भाग्यात थोडीशी उणिव निर्माण करण्याचं काम करणार आहे. अर्थात, इतर सर्व ग्रहांची स्थिती लक्षात घेता तुम्हाला खूप काही प्राप्त होणार आहे आणि ते प्राप्त करणारही आहात. मात्र त्यासाठी तुमचे कर्म महत्त्वाचे ठरणार आहेत. अनेक वेळा भाग्याची थोडी साथ तुम्हाला कमी प्राप्त होईल. तरी देखील तुम्ही आपल्या कर्माने यश खेचून आणाल. राहुची सप्तम स्थानावर पडणारी दृष्टी ही घरात कधी कधी विसंवाद निर्माण करु शकते. मात्र ती स्थिती अत्यंत अल्प काळासाठी असेल. म्हणून त्या बाबतीत तुम्ही अधिक चिंता करु नये. सोबत भाग्य स्थानावर पडणारी राहुची दृष्टी आणि तिथे विराजमान असलेला केतु यामुळे भाग्यात थोडी उणिव निर्माण होईल. त्यामुळे आपले परिश्रम वाढविणे, भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक राहिल. यानंतर इच्छापूर्तीच्या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्व इच्छांना तथास्तू म्हणणार आहे. #astrogurudrjyotijoshi

एकंदरीत कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राहुचं गोचर लाभदायक तर केतुचं गोचर हे थोडंस त्रासदायक ठरेल. अनेक वेळेला असं घडतं की या दोन ग्रहांपैकी एकाच गोचर हे अत्यंत शुभ व लाभदायक ठरतं. तर दुसऱ्या ग्रहाचं गोचर हे अशुभ व त्रासदायक ठरतं. मात्र राहुला तीन दृष्ट्या असतात आणि केतु धड असल्यामुळे काही ज्योतिषी त्याच्याही तीन दृष्ट्या म्हणत असले तरी प्रत्यक्षात त्याची एकच दृष्टी प्रभाव टाकते. त्यानुसार केतुचा प्रभाव दोन घरांवर तर राहुचा प्रभाव चार घरांवर पडत असतो. अर्थात ज्या राशीला राहु शुभ असतो, त्या राशीच्या पत्रिकेतील चार घरं शुभदायक ठरतात आणि ज्या राशीला केतु शुभ असेल त्या राशीच्या पत्रिकेतील फक्त दोनच घरांसाठी शुभ फळं प्राप्त होतात. त्यानुसार कुंभ राशी पुन्हा भाग्यवान ठरते. राहु शुभ तुमच्या राशीला शुभ असल्यामुळे चार घरांची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यांचा स्विकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहायला हवं.

राहु-केतु परिवर्तनाचे कुंभ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *