Skip to content
Home » गुरु परिवर्तन – वृषभ रास

गुरु परिवर्तन – वृषभ रास

  • by

परिश्रमात प्रचंड वृद्धी

लाभासह इच्छापूर्ती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक शुभ ग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय. म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरुन त्या पत्रिकेची किंवा त्या जातकाच्या जीवनाचे यश-अपयश निर्धारीत होत असते. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांकडे असतं. कारण त्यांच्या स्थानाबरोबरच त्यांच्या तीन दृष्टींचाही खूप मोठा परिणाम होत असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. संतती, शिक्षण, विवाह, अर्थार्जना सोबत आयुष्याचा शेवट ज्याला आपण मृत्यू म्हणू शकतो किंवा मोक्ष देखील म्हटलेलं जास्त उत्तम राहिलं, या सर्वांचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. अशा या गुरु महाराजांच्या कारकत्वामध्ये गत तीन-चार वर्षात कुठेतरी कमी निर्माण झालेली होती. त्यांचा प्रवास त्रासदायक पद्धतीने सुरु होता.

अर्थात, सर्व प्रथम जेव्हा स्वत:च्या धनु राशीत त्यांनी प्रवेश केला त्यावेळी तिथे त्यांच्या सोबत केतु देखील विराजमान होता. परिणामी गुरु – केतु युती तिथे घडून आली होती. किंबहूना तिथे या दोघांमध्ये ग्रहयुद्ध घडून आलं होतं. ज्यात गुरु महाराजांचा पराभव झाला होता. परिणामी स्वराशीत असून देखील गुरु महाराज आपली शुभ फळं सर्वार्थाने देऊ शकले नव्हते. त्यानंतर गुरु महाराजांची मकर राशीत प्रवेश केला. मकर ही त्यांची नीच रास आहे. त्यानंतर अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते मकर राशीत परत आलेत आणि नीचीचे झालेत. पुन्हा अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. वर्तमान स्थितीतही कुंभ राशीतूनच त्यांचा प्रवास सुरु आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाची अत्यंत शुभ फळे सर्वच राशींना प्राप्त होतील. अर्थात, शुभ फळे काही राशींना कमी मिळतील तर काही राशींना जास्त मिळतील. मात्र शुभ फळं मिळतील, हे नक्की! कारण गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत. सोबतच ते दीर्घकाळ एका राशीत राहतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा प्रकर्षाने समोर येतो. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेसाठी गुरु महाराज अष्टमेश आणि लाभेश आहेत. म्हणजे तुमच्या अष्टम आणि लाभ या स्थानाचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे असतं. आता राशी परिवर्तन करुन ते तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुरु महाराजांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत. पत्रिकेतील लाभ स्थान म्हणजे इच्छापूर्तीचं स्थान होय. ज्योतिष नियमांनुसार या स्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो. किंबहूना तो लाभ देण्यासाठीच तिथे आलेला असतो. जवळपास तेरा महीने गुरु महाराज या स्थानात राहणार आहेत. मीन राशीत ते प्रवेश करणार असून त्यांची ती स्वत:ची जलतत्त्वाची रास आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शुभ प्रभावात प्रचंड वृद्धी होणार आहे. म्हणजे तुम्ही एखादी इच्छा मनात धरावी आणि परमेश्वराने तुम्हाला तथास्तू म्हणावं, अशी काहीशी ही स्थिती असणार आहे. मात्र याला आपले पूर्व संचित आणि कर्म कारणीभूत असतात. कारण गुरु महाराज इच्छापूर्तीच्या स्थानापर्यंत येत असतांना मागील संचित आणि मागील कर्म यांच्या नोंदी घेतलेल्या असतात. त्या सर्वांचं वहीखातं घेऊन तो तुमच्या लाभ स्थानात आता येणार आहेत. त्याबळावरच ते तुम्हाला शुभ फळं प्रदान करतील. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

      तर असे गुरु महाराज तुमच्या अकराव्या स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्योतिष नियमांनुसार अकरावा गुरु हा अत्यंत शुभ व लाभदायक मानला जातो. कारण मनुष्य आपल्या सर्व इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी जगतो आणि आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे वृषभ जातकांसाठी हे गुरु परिवर्तन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील काही वर्षांमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी संघर्ष करीत होता, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्हाला हव्या होत्या त्या तुम्हाला अलगत प्राप्त होतील. जसं आपल्याला माहितीच आहे की गुरु महाराजांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यांच्या स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असतं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार लाभ स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तृतीय म्हणजे पराक्रम, परिश्रम व लहान मोठ्या प्रवासाच्या स्थानावर पडणार आहे. या स्थानावरुन शेजारी व बंधुसौख्य देखील बघितलं जातं. अशा या तृतीय स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे भावंडांसोबतच तुमचं सौख्य वाढणार आहे. शेजार्‍यांशी देखील तुमचे संबंध चांगले राहतील. या काळात तुमचे लहान मोठे प्रवास घडून येतील. तुमच्या परिश्रमाला योग्य ती दिशा प्राप्त होईल. योग्य वेळी योग्य दिशेने परिश्रम करुन त्यातुन तुम्ही सुयोग्य यश प्राप्त कराल.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती, प्रणय यांचा बोध होत असतो. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांनी मनोकामना पूर्ण होईल. जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षणात प्रचंड यश प्राप्त होईल. तुमच्या शिक्षणाला, अभ्यासाला योग्य दशा आणि दिशा प्राप्त होईल. अभ्यासात तुम्ही प्रगती करु शकाल व त्या बळावर तुम्हाला अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. या काळातील तुमचं शिक्षण किंवा केलेला अभ्यास हा तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणारा असेल. तसेच उपवर मुला-मुलींना योग्य जोडीदार प्राप्त होईल. कदाचित एखादा मित्र किंवा मैत्रीण देखील प्राप्त होऊ शकते. थोडक्यात शिक्षण, संतती, प्रेम या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असेल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. ही दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेली काही दिवस तुमच्या घरात जो थोडासा विसंवाद सुरु होता, भांड्याला भांडे जरा जास्तच लागत होते ते प्रमाण आता कमी व्हायला सुरुवात होईल. आता संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांड लागणं हे अत्यंत स्वाभाविक असतं. मात्र तुमच्या घरात त्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलेलं होतं आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ती गोष्ट आता कुठेतरी थांबणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जोडीदाराशी तुमचा सुसंवाद वाढणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थानावरुन आपण व्यवसाय देखील बघतो. त्यानुसार व्यवसायातील यशाची टक्केवारी देखील वाढणार आहे. किंबहूना व्यवसायाची दिशा समृद्ध होईल.

एकंदरीत गुरु महाराज त्यांच्या तीनही दृष्टीने तुम्हाला अमृताचे तीन कळस देणार आहे. त्याचं प्राशन तुम्ही करायचं आहे. जेणे करुन तुम्हाला त्यापासून लाभ प्राप्त होऊ शकेल. गुरु महाराज तुमच्या पत्रिकेचे अष्टमेशही आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अष्टम स्थानापासून देखील शुभ फळं प्राप्त होतील. त्यामध्ये अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होणं, कौटुंबिक प्रॉपर्टीतून लाभ प्राप्त होणं या पद्धतीने देखील तुम्हाला लाभ प्राप्त होतील. थोडक्यात वृषभ राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम आणि लाभ अशी पाच स्थानं गुरु महाराज शुभ करणार आहेत. या पाच स्थानांच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. एकंदरीत गुरु महाराज तुम्हाला भरभरुन दोन्ही हातांनी देणार आहेत. त्यातील काय घ्यावं? काय घेऊन नये? किंवा किती घ्यावं? हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असणार आहे. विशेषत्वाने वृषभ जातकांसाठी या काळात शनि महाराजांचंही गोचर लाभदायक ठरणार आहे. जे २९ एप्रिल रोजी होणार आहे. राशीनुसार त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण करणारे स्वतंत्र व्हिडिओ आपण बनविणार आहोत. राहुचं गोचर देखील तुमच्यासाठी शुभ ठरेल. त्याच्या प्रभावाचं विश्लेषण आपण स्वतंत्ररीत्या या आधीच केलेलं आहे.

एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करुन सर्वच राशींना त्या त्या प्रमाणात शुभ फळं प्रदान करणार आहेत. त्यामुळे या काळात एकंदरीतच युग परिवर्तन होईल. समाजात, मानवी आयुष्यात मोठे बदल घडून येतील. किंबहूना मानवी आयुष्य सुखदायक होईल, असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. कारण एप्रिल महिन्यात जे सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन घडून येत आहे, ते तब्बल हजारों वर्षांनंतर घडून येणार आहे. सर्वच्या सर्व ग्रह म्हणजे रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु या सर्व ग्रहांनी एका महिन्यात राशी परिवर्तन करने ही खूप मोठी घटना ठरणार आहे. साहजिकच ही बाब वृषभ जातकांसाठी देखील अत्यंत शुभ व लाभदायक राहिल.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार वृषभ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता वृषभ जातकांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं दान करावं. असं साहित्य जे त्यांना रोजच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरु शकेल. तुमचे अष्टमेश आणि लाभेश गुरु महाराज असल्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे वृषभ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *