Skip to content
Home » गुरु परिवर्तन – मिथुन रास

गुरु परिवर्तन – मिथुन रास

  • by

राजयोगाची स्थिती

होईल चौफेर प्रगती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ग्रहांपैकी चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे चार नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात. मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिमेजवळचा चंद्र हा शुभ असतो तर अमावस्येजवळचा चंद्र हा अशुभ मानला जातो. चंद्र हा सूर्यापासून जितका लांब असेल, जितकी घरं तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो. याशिवाय देखील शुभत्त्वाच्या बाबतीत चंद्राला अनेक अटी लागू आहेत. बुध ग्रह देखील नैसर्गिक शुभ ग्रह आहे. मात्र तो ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला अनुसरुन त्याच्या प्रवाभावाची दिशा बदलते. त्यामुळे त्याच्या नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणिव निर्माण होते. मग गुरु आणि शुक्र हे सगळ्यात शुभ ग्रह दोनच उरले. शुक्र साधारणपणे महिन्याभरात राशी बदल करतो. म्हणजे त्याचे जे काही शुभ-अशुभ परिणाम असतील ते तो एका महिन्यात देतो. म्हणजे छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर हे शुभत्व देतं. मात्र गुरु महाराज एका राशीत जवळपास १३ महीने विराजमान असतात.

सोबतच त्यांच्या दृष्ट्यांचाही खूप मोठा परिणाम होत असतो. इतर सर्व शुभ ग्रहांना सप्तम ही केवळ एकच दृष्टी असते. मात्र गुरु महाराजांकडे पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृततुल्य मानले जाते. म्हणजे राशी राशीत १३ महीने राहून एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांमध्ये आहे. त्या चारही स्थानांच्या कारकत्वानुसार अत्यंत शुभ फळं जातकांना प्राप्त होतात. म्हणूनच गुरु महाराजाचं गोचर किंवा त्यांचं राशि परिवर्तन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. आता तर ते विशेेषत्वाने महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण गेली तीन वर्ष सातत्याने नकारात्मक, संघर्षदायक प्रवासातून आता ते सुखदायक प्रवासाला आता ते सुरुवात करणार आहेत. आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास गुरु महाराज गत तीन वर्षांपासून खडकाळ रस्त्यावर मार्गक्रमण करीत होते. स्वत: खडकाळ रस्त्यावर असतांना देखील जमेल तेवढी शुभ फळं त्यांनी जातकांना दिलेली आहेत. मात्र त्यांचाच प्रवास संघर्षमय स्थितीत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडत होता. स्वत:च्या मीन राशीत प्रवेश केल्यानंतर आता ते छानपैकी चौपदरी रस्त्यावरुन वाटचाल सुरु करणार आहेत. परिणामी त्यांची अत्यंत शुभ फळं सर्वांनाच प्राप्त होणार आहेत. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या राशीचे सप्तमेश आणि दशमेश आहेत. म्हणजे मिथुन राशी किंवा लग्नाला सप्तम आणि दशम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र स्थानाचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. म्हणूनच तुमच्यासाठी गुरु महाराज हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह ठरतात आणि म्हणूनच त्यांचं राशी परिवर्तनही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. मागील काही महिन्यांपासून ते तुमच्या भाग्य स्थानात विराजमान होते. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहेत. वास्तविक पाहता मिथुन राशीसाठी गुरु महाराज हे कारक ग्रह नाहीत. कारण दोन केंद्र स्थानांचे स्वामी असल्यामुळे त्यांना केंद्राधिपती दोष लागतो. तरी देखील दोन महत्त्वाच्या स्थानांचे स्वामी असल्यामुळे त्या स्थानांच्या कारकत्वानुसार जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे येतात. विशेषत: वैवाहिक सुख, वैवाहिक जोडीदार, व्यवसाय, कर्म या विभागांचं कारकत्व गुरु महाराजांकडे येतं. असे हे गुरु महाराज आता राशी परिवर्तन करुन तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहेत. तिथे मीन ही त्यांची जलतत्त्वाची रास येते. त्यांची ही स्थिती मिथुन जातकांसांठी अत्यंत शुभ म्हणता येईल.

गुरु महाराजाचं दशम स्थानातील सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे ते पंच महापुरुष योगांपैकी एक असलेल्या हंस योगाचे निर्माण करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा राजयोग तुमच्या कर्म स्थानात निर्माण होणार आहे. केंद्र स्थानांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्योतिष नियमांनुसार प्रथम स्थानापेक्षा चतुर्थ स्थान अधिक बलवान असतं. चतुर्थापेक्षा सप्तम आणि सप्तमापेक्षा दशम हे स्थान सर्वात अधिक बलवान केंद्र स्थान मानलं जातं. अशा या बलवान केंद्र स्थानात सर्वात शुभ ग्रह गुरु महाराज आणि त्यांच्या द्वारे निर्माण होणारा पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा असलेला राजयोग म्हणजे हंस योगाची निर्मिती ही मिथुन जातकांच्या दृष्टीने अत्यंत शुभदायक, लाभदायक, प्रगतीदायक, कर्तृत्वादायक, धर्मदायक बाब राहिल. आता गुरु महाराज जवळपास तेरा महिने तुमच्या कर्म स्थानात राहतील. हा संपूर्ण कालावधी तुमच्या व्यवसायासाठी, व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी, व्यवसायाच्या विकासासाठी, नवीन व्यवसायाच्या सुरुवातीसाठी अत्यंत उपयुक्त राहिल. विशेषत: जे मिथुन जातक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतील, लेखक-कवी असतील, मॅनेजमेंट सेक्टरमध्ये असतील, शिक्षणाच्या संदर्भात नवनवीन कार्य जे करीत असतील, संशोधन क्षेत्रात जे शिक्षण घेत असतील किंबहूना अकाऊंट, सीए अशा सर्व विभागातील जातकांसांठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक ठरेल. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

      तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणारे गुरु महाराज तुमचं दशम स्थान तर शुभ करणारच आहेत. सोबतच त्यांच्या दृष्ट्यांचाही खूप मोठा शुभ प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. आपल्याला माहितीच आहे की गुरु महाराजांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. महत्त्वाची बाब म्हणजे स्थानांपेक्षा त्यांच्या दृष्ट्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी मानतात. त्यानुसार दशम स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर पडेल. त्यानंतर सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर तर नवम दृष्टी षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील द्वितीय स्थानाला धन, कुटुंब व वाणी यांचं स्थान म्हटलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमच्या वाणीतून ज्ञान पाझरेल. म्हणजे तुम्ही जे काही बोलाल ते अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण असेल. सोबतच धनप्राप्ती देखील होईल. कारण द्वितीय स्थान हे धन स्थान देखील असतं. अनेक मार्गांनी तुम्हाला धनलाभ होईल. विशेषत: तुमच्या व्यवसायातून, कर्मातून धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. सोबतीला कौटुंबिक सौख्य देखील असणार आहे.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हणून संबोधलं जातं. वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य अशा विविध गोष्टी त्यावरुन बघितल्या जातात. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या घरातील सुख, शांती, समृद्धी अधिक वृद्धींगत होणार आहे. याशिवाय अत्यंत शुभ असे वास्तुयोग, वाहनयोग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जे मिथुन जातक अनेक दिवसांपासून वास्तु किंवा वाहनाचे स्वप्न पाहत असतील त्यांची स्वप्नपूर्ती या काळात घडून येईल. त्या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील. कारण ते शुभ योग गुरु महाराज तुमच्यासाठी निर्माण करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात तुमचे भाग्येश शनि महाराज देखील राशी परिवर्तन तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करतील. राहु सारखा ग्रह तुमच्या लाभ स्थानात असेल आणि गुरु महाराज तुमच्या दशम स्थानात असेल. या तिघांचं सहकार्य मिथुन जातकांना मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. म्हणून येणाऱ्या एप्रिल महिन्यानंतर मिथुन जातक अनेक क्षेत्रात, अनेक आघाड्यांवर भरभरुन प्रगती करणार आहेत. अर्थात, केवळ प्रगती देखील काही कामाची नसते. जर तुमच्या घरात सुखशांती, समृद्ध नसेल, घरात एकोपा, प्रेम नसेल तर पैसा हा अर्थहीन ठरतो. मात्र या काळात तुमच्या घरात सुख, शांती, प्रेमही निर्माण होईल. कौटुंबिक सौख्यही निर्माण होईल आणि पैसाही येईल.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन आरोग्य, नोकरी, कर्ज, स्पर्धक, शत्रु या गोष्टी बघितल्या जातात. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीचा परिणाम म्हणजे तुमचे शत्रु स्वत:हून माघार घेतील किंवा तुम्हाला विरोध करण्यामध्ये त्यांना फारसा उत्साह उरणार नाही. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते अगदी सहज प्राप्त होऊ शकेल. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरु शकतं. म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही ते घेतलेलं असेल, त्याच कामासाठी त्याचा उपयोग होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम आरोग्य तुम्हाला या काळात लाभणार आहे.

थोडक्यात हंस योग निर्माण करणारे गुरु महाराज तुम्हाला चहु बाजुंनी भरभरुन शुभ फळं देणार आहेत. त्याचा भरघोस आनंद घ्यावा. किंबहूना येथून पुढे तुमच्या आयुष्यात अत्यंत सकारात्मक, शुभ व लाभदायक असे मोठे बदल घडून येणार आहेत. त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करुन घ्यावा. आयुष्य मनसोक्त जगावं. योग्य मार्गाने पैसा कमवावा. योग्य पद्धतीने कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि उत्तम आयुष्य जगावं.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार मिथुन राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेत गुरु महाराज दशम स्थानातून हंस योगाची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे मिथुन जातकांनी एखाद्या तरुणाला त्याच्या व्यवसायात सहकार्य करावे. मग त्यात तुम्ही त्याला मार्गदर्शन करु शकता किंवा आवश्यक ती मदतही करु शकता. थोडक्यात कोणताही हेतू न बाळगता त्याच्या व्यवसाय समृद्धीसाठी सहकार्य करावं. जे तुम्हालाही फायदेशीर ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे मिथुन राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *