Skip to content
Home » गुरु परिवर्तन – मीन रास

गुरु परिवर्तन – मीन रास

वाढ भाग्यासह कर्मात

आनंदी आनंद जीवनात

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

मागील काही भागांमध्ये आपण गुरु ग्रह व त्याच्या परिवर्तनाचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. आता आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत आधी थोडी माहिती समजून घेऊया. जेणे करुन या गुरु परिवर्तनाचे महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. खरं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचाच जरी अभ्यास केला तरी ती आपल्याला अनेक वेळा वेगवेगळे संकेत देत असते. पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्य स्थान म्हणून ओळखतो. पूर्व जन्माचं आपण जे संचित घेऊन आलेलो असतो ते संचित देखील या स्थानातून दिसतं. अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. त्यानंतर दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही मिळालेल्या आयुष्यात जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी येथे केल्या जातात. ते नोंदी करण्याचं काम शनि महाराजांकडे असतं. म्हणजे आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. कारण निसर्ग कुंडलीच्या कर्म स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे असतं. आता या दोघांचा सामुहिक होणारा परिणाम एकादश स्थानातून म्हणजे लाभ आणि इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यस्त होतो. भाग्य आणि कर्म या दोघांचा परिणाम म्हणजे लाभ होय. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्ये पूर्ण करतात. सर्वांना सर्व देऊन टाकतात. मोकळेपणाने खर्च करतात. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतात आणि ते केल्यानंतर तुम्ही मोक्षाकडे जातात. तिकडे नेणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्यय स्थान होय.

महत्त्वाची बाब म्हणजे या व्यय स्थानाचं कारकत्व देखील गुरु महाराजांकडे आहे. थोडक्यात पत्रिकेतील भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय या चार स्थानाचं खूप सुंदर असं सुसुत्र आहे. हे चारही स्थानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या क्रमाने देखील येतात. नवम हे धर्म स्थान, दशम हे कर्म स्थान, एकादश हे लाभ तर द्वादश हे व्यय स्थान असतं. अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते आणि त्यानुसारच आपलं जीवन व्यतीत होत असतं. जेव्हा आपण ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करीत असतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडते आणि अत्यंत प्रसन्नता प्रदान करते. कारण प्रत्येक ग्रहाची दिशा याच पद्धतीने होते. त्यांचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम देखील याच पद्धतीने होतात. याचा सखोल अभ्यास केल्यास यातून आपल्याला आयुष्याचं सूत्र सापडतं. ही आपल्या ऋषीमुनींची शक्ती आहे, की ज्यांच्या परिश्रमाने, संशोधनाने अशी सुसुत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होत असते. याद्वारे गुरु महाराजांचं राशी भ्रमण व राशी परिवर्तनाच्या महत्त्वाचा तुम्ही अंदाज तुम्ही घेऊ शकता. तर गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा मीन राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

मीन रास किंवा लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी स्वत: गुरु महाराज आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आता ते तुमच्या राशीतच प्रवेश करणार आहेत. जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. राशी स्वामी राशीत असणं किंवा लग्नेश लग्न स्थानात असणं हा अत्यंत शुभ योग मानला जातो. त्याहुन महत्त्वाची बाब म्हणजे राशीत येणारे गुरु महाराज पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या हंस योगाची निर्मिती करणार आहेत. जो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्याची भरभरुन शुभ फळं मीन जातकांना प्राप्त होणार आहेत. पत्रिकेमध्ये पंचमहापुरुष योगांपैकी कोणताही योग जेव्हा घडून येतो तेव्हा तो परिपूर्ण लाभदायक असतो. विशेषत: तो जेव्हा केंद्रातून होतो तेव्हा विशेष लाभदायक असतो आणि जेव्हा तो राशीतून होतो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करण्याचं काम करतो. भरपूर मोठे यश प्रदान करतो. हंस योग गुरु महाराजांमुळे निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा संबंध विशेषत्वाने ज्ञानाशी, सामंजस्याशी येतो. समाजात जिथे जिथे वाद निर्माण होत असतील, कुणाला मार्गदर्शनाची गरज असेल अशा वेळी लोक स्वत:हून तुमच्याकडे येतात. तुमचं मार्गदर्शन घेतात आणि तुमच्या योग्य मार्गदर्शनाने त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सुटतात. म्हणजे हा योग तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात, विचारात प्रगल्भता निर्माण करेल. त्यामुळे तुमच्या प्रथम स्थानात निर्माण होणारा हा राजयोग तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. म्हणून या योगकारक, लाभकारक काळाचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यायला हवा.

राशी स्वामी राशी किंवा लग्नेश लग्नात असतांना जातकाचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रबळ होतं. विचार प्रगल्भ होतात. साहजिकच त्याचा लाभ प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कामात होत असतो. सोबतच प्रथम स्थानातील गुरु महाराज हे अनेक दोष कमी करणारे ठरतात. पत्रिकेतील प्रथम स्थान त्यांना विशेष मानवतं. ते मनुष्य जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण अशा गोष्टींचे कारक ग्रह आहेत. ती सर्व फळे ते जातकाला प्रदान करतात. त्यात मीन राशीचे तर ते स्वामी आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांची भरभरुन शुभ फळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. गुरु महाराजाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी पत्रिकेतील अनेक स्थानांवर प्रभाव टाकण्याचं त्यांच्यात सामर्थ्य असतं. पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या त्यांना असतात. ज्यांचा प्रभाव हा खूप मोठा असतो. किंबहूना स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असतं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

      त्यानुसार विचार केला असता तुमच्या प्रथम स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती आणि प्रणय या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात. इष्टदेवाचं स्थान म्हणूनही या स्थानाला संबोधलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुम्हाला भरभरुन शुभ फळं प्राप्त होतील. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही विषयाचं शिक्षण घेत असाल तरी त्यात तुम्हाला फार मोठं यश मिळेल. थोडक्यात शैक्षणिक यश प्राप्त करण्याचा, अभ्यासाचा उन्नती करण्याचा हा कालखंड असेल, जो जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण बऱ्याच अंशी त्यावर पुढील जीवन अवलंबून असतं. म्हणून शिक्षण घेण्याऱ्या मीन जातकांनी ही बाब आधीच लक्षात घेऊन अधिक प्रयत्न करायला हवेत. अधिक अभ्यास करायला हवा. या काळात केलेला अभ्यास तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल. इतर प्रभावांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास संतती तुमच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय संततीचं कर्तृत्व विकसित होईल. संतती ज्या क्षेत्रात असेल तिथे त्यांना यश प्राप्त होईल. तुमच्या दोघांमधील सुंसवाद वाढेल. ती बाब निश्चितच तुमच्यासाठी अत्यंत सुखकारक असेल.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. सोबतच या स्थानावरुन व्यवसाय देखील बघितला जातो. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीचा परिणाम म्हणजे जोडीदारासोबत तुमचा संवाद वाढेल. तुमचं नातं अधिक समृद्ध होईल. संसारातील विविध प्रश्न तुम्ही सामंजस्याने सोडवाल. तुमच्या विचारांमध्ये एकवाक्यता येईल. कोणताही निर्णय तुम्ही एकमेकांच्या सल्ल्याने घ्याल आणि त्यानुसारच पुढील वाटचाल कराल. जे तुमच्या प्रगतीसाठी, वैवाहिक आयुष्यासाठी अत्यंत योग्य राहिल. थोडक्यात या काळात तुमचं कौटुंबिक सौख्य वाढणार आहे. मीन जातकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या घरात जर शांतता असेल, सुखशांती असेल, प्रेमभावना असेल तर तुम्ही बाहेरील कुठल्याही आघाडीवर यश मिळवू शकता. कोणत्याही संघर्षाचा सामना करु शकता. ते सर्व तुम्हाला गुरु महाराजांच्या कृपेने प्राप्त होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीचा, संघर्षाचा तुम्ही सामना करु शकणार आहात.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडणार आहे. ही दृष्टी तुमचं भाग्य उज्ज्वल करणार आहे. म्हणजे या काळात तुम्हाला भाग्याचं पुरेपुर सहकार्य प्राप्त होईल. तुमचं भाग्य समृद्ध होईल. भाग्याची साथ असेल तर आपल्या प्रयत्नांच्या यशाची टक्केवारी वाढत असते. म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न, परिश्रम करायला हवेत. जेणे करुन भाग्याच्या सहकार्याचा तुम्ही सदुपयोग घेऊ शकाल. तसेच भाग्य स्थानावरुन आध्यात्म किंवा धर्म देखील बघितला जातो. त्यानुसार या काळात तुमच्या हातातून आध्यात्मिक कार्य घडतील. एखाद्या मोठ्या जबाबदारीचं पद तुमच्याकडे स्वत: चालत येईल. धार्मिक संस्थेच्या कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, समाजाच्या कार्यामध्ये तुम्ही आघाडी घेणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे ते कार्य तुम्ही यशस्वीरीत्या पूर्ण देखील करणार आहात. त्यामुळे समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त होणार आहे. किंबहूना या काळात तुमच्याकडून एखादं भव्यदिव्य कार्य देखील घडून येण्याची संभावना आहे. तसे योग तुमच्या पत्रिकेत तयार होतांना दिसून येत आहेत. अर्थात, या स्थितीला मूळ पत्रिकेतील ग्रहस्थितीचं थोडं जरी पाठबळ मिळालं तरी मीन जातक या काळात दैदिप्यमान यश गाठतील, असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो.

जे मीन जातक परदेशात स्थायीक झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील या काळात सुसंधी निर्माण होतील. ते देखील उन्नतीच्या मार्गावर चालण्याचा किंवा उन्नती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात यशस्वी देखील होतील. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांना स्थैर्याची अनुभूती प्राप्त होईल. थोडक्यात राशी येणारे गुरु महाराज प्रथम, पंचम, सप्तम, भाग्य आणि दशम अशा पत्रिकेतील एकूण पाच स्थानांवर आपला शुभ प्रभाव टाकणार आहेत. या पाचंही स्थानांना ते समृद्ध करणार आहेत. त्यामुळे या पाचही स्थानांच्या कारकत्वानुसार अत्यंत शुभ फळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. एकंदरीत गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन मीन जातकांसाठी अत्यंत लाभदायक राहिल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार मीन राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता मीन जातकांनी जास्तीत जास्त गाईची सेवा करावी. गाईला गुळपोळी खाऊ घालावी. तिला प्रदिक्षणा घालावी. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे मीन राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *