Skip to content
Home » गुरु परिवर्तन –  कन्या रास

गुरु परिवर्तन –  कन्या रास

  • by

परिश्रमाद्वारे उन्नती

लाभासह इच्छापूर्ती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक शुभ ग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय. म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरुन त्या पत्रिकेची किंवा त्या जातकाच्या जीवनाचे यश-अपयश निर्धारीत होत असते. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांकडे असतं. कारण त्यांच्या स्थानाबरोबरच त्यांच्या तीन दृष्टींचाही खूप मोठा परिणाम होत असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. संतती, शिक्षण, विवाह, अर्थार्जना सोबत आयुष्याचा शेवट ज्याला आपण मृत्यू म्हणू शकतो किंवा मोक्ष देखील म्हटलेलं जास्त उत्तम राहिलं, या सर्वांचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. अशा या गुरु महाराजांच्या कारकत्वामध्ये गत तीन-चार वर्षात कुठेतरी कमी निर्माण झालेली होती. त्यांचा प्रवास त्रासदायक पद्धतीने सुरु होता. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

अर्थात, सर्व प्रथम जेव्हा स्वत:च्या धनु राशीत त्यांनी प्रवेश केला त्यावेळी तिथे त्यांच्या सोबत केतु देखील विराजमान होता. परिणामी गुरु – केतु युती तिथे घडून आली होती. किंबहूना तिथे या दोघांमध्ये ग्रहयुद्ध घडून आलं होतं. ज्यात गुरु महाराजांचा पराभव झाला होता. परिणामी स्वराशीत असून देखील गुरु महाराज आपली शुभ फळं सर्वार्थाने देऊ शकले नव्हते. त्यानंतर गुरु महाराजांची मकर राशीत प्रवेश केला. मकर ही त्यांची नीच रास आहे. त्यानंतर अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते मकर राशीत परत आलेत आणि नीचीचे झालेत. पुन्हा अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. वर्तमान स्थितीतही कुंभ राशीतूनच त्यांचा प्रवास सुरु आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाची अत्यंत शुभ फळे सर्वच राशींना प्राप्त होतील. अर्थात, शुभ फळे काही राशींना कमी मिळतील तर काही राशींना जास्त मिळतील. मात्र शुभ फळं मिळतील, हे नक्की! कारण गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत. सोबतच ते दीर्घकाळ एका राशीत राहतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा प्रकर्षाने समोर येतो. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा कन्या राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

कन्या रास किंवा लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या पत्रिकेचे चतुर्थेश व सप्तमेश आहेत. म्हणजे पत्रिकेतील चतुर्थ आणि सप्तम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गुरु महाराज तुमच्या राशीला कारक नसले तरी त्यांची स्थिती, त्याचं गोचर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत. तिथे ते पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या हंस योगाचे निर्माण करणार आहेत. जो अत्यंत शुभ व महत्त्वाचा असा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याची अत्यंत शुभ फळं कन्या जातकांना भरभरुन प्राप्त होणार आहे. जसं आपल्याला माहितीच आहे की पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान मानलं जातं. त्यामुळे स्थानाच्या कारकत्वानुसार या काळात तुमचं वैवाहिक जीवन समृद्ध होईल. जोडीदाराशी तुमचा योग्य सुसंवाद राहिल. सोबतच या स्थानावरुन आपण व्यवसाय देखील बघतो. त्यानुसार या काळात तुमच्या व्यवसायात वृद्धी घडून येईल. तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा प्राप्त होईल. ज्यामुळे उन्नतीचे मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होतील.

      अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सप्तम स्थानात प्रवेश करणारे गुरु महाराज आपल्या दृष्टींद्वारे एकाच वेळी अजून दुसरे तीन महत्त्वपूर्ण स्थानं शुभ करणार आहेत. सोबतच ते चतुर्थेशही असल्यामुळे त्या स्थानाची देखील तुम्हाला शुभ फळं प्राप्त होणार आहेत. आपल्याला माहितीच आहे की गुरु महाराजांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यांचा प्रभावही खूप मोठा असतो. किंबहूना स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हणतात. त्यानुसार सप्तम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या एकादश स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या सर्व इच्छा अचानकपणे पूर्ण होतील. गत काळात ज्या ज्या सुप्त इच्छा तुमच्या मनात असतील त्या सर्वांच्या पूर्तीचा हा कालखंड असेल. सोबतच खूप मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. ज्या जातकांनी आधी कुठे गुंतवणूक केलेली असेल तेथूनही त्यांना लाभ प्राप्त होईल. थोडक्यात भरपूर लाभ प्रदान करणारा व इच्छापूर्ती करणारा हा कालखंड असेल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावेत. जेणे करुन या लाभदायक काळाचा सदुपयोग होऊ शकेल.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे प्रथम स्थानावर पडेल. पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकाचं स्वत:चं स्थान असतं. या स्थानावरुन व्यक्तिमत्त्वाचा बोध होतो. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात अनेक मोठे व आमुलाग्र असे सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या विचारांची दिशा उचित राहिल. किंबहूना तुमचे विचार किंवा एकूणच तुमचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रगल्भ होईल. आपला विषय, आपला मुद्दा योग्य पद्धतीने मांडणं ही कला तुमच्यात मूळत: असते. ते तुम्ही नेहमीच करीत असतात. मात्र गुरु महाराजांच्या दृष्टीचा प्रभाव म्हणून त्याच्यात ज्ञानाची वाढ होणार आहे. म्हणजे योग्य, अभ्यासपूर्ण मांडणी तुमच्याकडून केली जाईल. ज्ञान वाढणार असल्यामुळे जे जातक शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी यशाच्या संधी वाढतील. शिक्षणात, अभ्यासात, ज्ञानात मोठी प्रगती घडून येईल. किंबहूना गुरु महाराजांचे सर्व सात्विक गुण तुमच्यात अवतरतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचा तुम्ही पूर्ण उपयोग करुन घ्यावा. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहिल. योग्य कारणासाठी योग्य परिश्रम करणं आणि त्यातून यश प्राप्त करणं, हे या काळातील तुमचं वैशिष्ट्य सांगता येईल. थोडक्यात गुरु महाराजांच्या कृपादृष्टीने या काळात तुमच्या परिश्रमाची, तुमच्या कर्माची दिशा योग्य राहिल. परिणामी त्यातून तुम्हाला योग्य ते फळं देखील प्राप्त होतील. सोबतच तृतीय स्थानावरुन बंधुसौख्य व लहान-मोठे प्रवास देखील बघितले जातात. त्यानुसार तुमच्या बंधुसौख्यात वृद्धी घडून येईल. लहान-मोठे प्रवास तुम्ही करणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे ते प्रवास देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.

एकंदरीत विचार केला असता गुरु महाराज तुमच्या पत्रिकेतील चतुर्थ आणि सप्तम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचे स्वामी आहेत. या गोचरमुळे ही दोन स्थानं तर शुभ होणारच आहेत. सोबतच लाभ स्थान, प्रथम स्थान आणि तृतीय स्थान अशा तीन स्थानांवर त्यांची शुभ दृष्टी पडणार आहे. तुमच्या पत्रिकेतील अशी एकूण पाच स्थानं ते एकाचवेळी शुभ करणार आहेत. त्या पाच स्थानांच्या कारकत्वानुसार तुम्हाला अत्यंत शुभ फळं देखील मिळतील. जवळपास तेरा महिने गुरु महाराज मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात विराजमान असतील. म्हणजे तेरा महिने त्यांची ही शुभ फळे तुम्हाला मिळत राहतील. म्हणूनच गुरु महाराजांचं हे गोचर कन्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहिल.

याच काळात म्हणजे २९ एप्रिल रोजी शनि महाराज देखील राशि परिवर्तन करुन तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत. ते तुमच्या राशीला पंचमेश आणि षष्ठेश आहेत. त्यामुळे त्यांची देखील तुमच्या राशीला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतील. खरं सांगायचं तर या एप्रिल महिन्यात सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष विश्वातील खूप मोठी ऐतिहासिक घटना ती असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बरेचशे ग्रह कन्या जातकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत. त्यामुळे हा काळ निश्चितच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व लाभादायक राहिल. किंबहूना त्याचे परिणाम तुम्हाला पुढील वर्षभर सातत्याने प्राप्त होत राहतील. प्रगतीच्या, उन्नतीचे विविध संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. त्याचा तुम्ही लाभही घेऊ शकणार आहात. किंहबूना तुम्ही तो घेतलाही पाहिजे. कारण काळ जेव्हा शुभ असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपले प्रयत्न, परिश्रम वाढविले पाहिजे. कारण त्यातून मिळणाऱ्या यशाची टक्केवारी ही निश्चितच जास्त असते.

हे यश मिळविण्यासाठी गुरु महाराज तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करणार आहेत. तुमच्या पत्रिकेत त्यांच्याद्वारे पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला शुभ राजयोग जरी निर्माण होत असला तरी येथे एक बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे कन्या राशीला गुरु हा कारक ग्रह नाही. परिणामी येथे केंद्राधिकती दोष देखील निर्माण होत आहे. असे असले तरी गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह किंवा सर्व ग्रहांपैकी सगळ्यात शुभदायक ग्रह म्हणून ओळखले जातात. त्यामुळे दोष जरी निर्माण होत असला तरी त्यांच्यापासून तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तुम्ही केवळ योग्य परिश्रम, योग्य कर्म करीत राहा. त्याची शुभ फळं गुरु महाराज तुम्हाला नक्कीच प्रदान करतील.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार कन्या राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे कन्या जातकांच्या सप्तमात गुरु महाराज हंस योग निर्माण करणार आहेत. जो तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात कन्या जातकांनी गाईची सेवा करावी. गाईला प्रदिक्षणा घालाव्यात. हिरवा चारा खाऊ घालावा. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे कन्या राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *