Skip to content
Home » गुरु परिवर्तन – वृषभ रास

गुरु परिवर्तन – वृषभ रास

सर्व सुखांसह होईल इच्छापूर्ती
अर्थ त्रिकोणातून लाभाची प्राप्ती
ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर वृषभ राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. गुरु म्हणजे दाता, गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे स्थैर्य होय. मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टीला महत्त्व आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. परित्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती, त्यांची शुभता-अशुभता याचा खूप मोठा प्रभाव मनुष्य जीवनावर पडत असतो. एखादं बाळ जन्माला येतं म्हणजे संततीचं कारकत्व गुरुकडे, शिक्षणाचं कारकत्व गुरुंकडे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यक्ती अर्थार्जन सुरु करतो त्याचं कारकत्व गुरुकडे, त्यानंतर विवाहाचं कारकत्व गुरुकडे, भाग्याचं कारकत्व गुरुकडे आहे. निसर्ग कुंडलीतील दोन, पाच, नऊ, अकरा या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं कारकत्व गुरु महाराजांकडे असतं. म्हणून गुरु हा पत्रिकेतील अत्यंत महत्वपूर्ण ग्रह ठरतो.
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
आनंदाची बाब म्हणजे आता ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे. गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे वृषभ राशीसाठी अष्टम आणि लाभ स्थानाचे स्वामी आहेत. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष दर्शवित असतं. तर लाभ स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. आयुष्यातील सर्व इच्छांची पूर्तता होणं, कौटुंबिक लाभ होणं, मित्रांकडून लाभ होणं किंवा योग्य मित्र लाभणं अशा सर्व गोष्टींचा लाभ येथून प्राप्त होत असतो. मुख्यत: यात आर्थिक लाभ हा अत्यंत महत्त्वाचा विभाग येतो. संतती सौख्य देखील येथूनच प्राप्त होतं. कारण गुरु महाराजांची पंचम स्थानावर दृष्टी पडत असते. थोडक्यात वृषभ राशीसाठी गुरु महाराज हे कारक ग्रह नसले तरी दोन अत्यंत महत्त्वाची स्थानं त्यांच्याजवळ असल्यामुळे त्या स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची सर्व कारकत्वे त्यांच्याकडे येतात. गोचरने गुरु महाराज आतापर्यंत तुमच्या भाग्य स्थानातून प्रवास करीत होते. खरं अष्टमाचा स्वामी जेव्हा नवम किंवा भाग्य स्थानातून प्रवास करतो तेव्हा कुठेतरी भाग्यात अडथळे देखील निर्माण होतात. शिवाय गुरु महाराज तिथे नीच अवस्थेत देखील होते. आता ते आपली नीच रास सोडून तुमच्या दशम स्थानात वायुतत्त्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. मकर आणि कुंभ या दोन्ही शनि महाराजांच्या राशी असल्या तरी त्यांच्यात मुलभूत फरक आहे. त्यामुळे त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.
गुरु महाराज हे पत्रिकेतील अत्यंत महत्त्वाचे ग्रह असतात. आयुष्यातील सगळीच महत्त्वपूर्ण खाती, म्हणजे शिक्षण, विवाह, संतती, धर्म, भाग्य, लाभ अशी सर्वच खाती त्यांच्याकडे असतात. त्यानुसारच त्यांचा प्रभाव तुमच्यावर होत असतो. असे हे गुरु महाराज आता तुमच्या कर्म स्थानात प्रवेश करणार आहेत. तिथे ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहेत. त्यानंतर ते अतिचार गतीने तुमच्या लाभ स्थानात जातील. लाभ स्थानात गेलेला गुरु हा अत्यंत शुभ असतो. आता ते आपल्या कार्याचा वेग वाढवून पुढील प्रवासाला निघणार आहेत. म्हणजे १३ महिन्यांचा असणारा हा प्रवास फक्त सहा महिन्यातच ते पूर्ण करणार आहेत. त्यानंतर ते स्वराशीत जातील. तेव्हा वृषभ जातकांना खर्‍या अर्थाने प्रचंड लाभ तेथून प्राप्त होईल. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील, त्यानुसार विचार केल्यास कुंभ राशी ही निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानाचं स्वामीत्व तिला मिळालेलं आहे. ती वायुतत्त्वाची बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. अशा बुद्धिमान राशीत धर्माचे कारक गुरु महाराज हे शुभ फळं देतील.
गुरु महाराज जिथे बसतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांची दृष्टी असते तेथील शुभता ते अधिक वृद्धिंगत करतात. म्हणजे त्या स्थानांची जास्त शुभ फळे प्राप्त होतात. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृततुल्य मानले गेले आहे. त्यानुसार विचार केला असता गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडणार आहे. तिचा प्रभाव म्हणजे कौटुंबिक ऐक्य, कौटुंबिक सलोखा निर्माण होईल. ज्यांच्या घरात कौटुंबिक प्रॉपर्टीची विभागणी होणार असेल किंवा त्याविषयीचे काही प्रश्न प्रलंबित असतील तर हा काळ त्यासाठी अत्यंत उत्तम आहे. त्याच्यातूनही तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. गुरु महाराज अर्थ त्रिकोणाच्या स्थानात येऊन एकटेच अर्थ त्रिकोण पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणारच आहे. अर्थात प्रत्येक वृषभ जातकाला एकसारखा आर्थिक लाभ प्राप्त होईल का? तर तसे अजिबात होणार नाही. तर मूळ कुंडलीनुसार लाभाच्या दिशा बदलतील. मात्र गुरु महाराज आता गोचरने तुमच्या कर्म स्थानात आलेले आहेत. तसेच आपल्या अमृतदृष्टीद्वारे ते अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत. परिणामी आर्थिक लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. फक्त फरक इतकाच की काहींना प्लॉटमधून, काहींना शेअर मधून, काहींना वास्तुमधून तर काहींना वाहनामधून आर्थिक लाभ प्राप्त होईल. म्हणजे लाभाची माध्यमं फक्त वेगवेगळी असतील.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तु,वाहन, जमीन, सुखशांतीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या अमृतुल्य दृष्टीचा परिणाम म्हणजे अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती होणं, घरात समाधान, सुखशांतीचं वातावरण निर्माण होणं, मातृसौख्य, वास्तु-वाहन सौख्य प्राप्त होणं, असे विविध लाभ या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यांचा तुम्ही पुरेपुर लाभ घ्यायला हवा.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान देखील अर्थत्रिकोणाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. नोकरी देखील याच स्थानावरुन बघितली जाते. त्यामुळे जे जातक नोकरीमध्ये गेली काही महीने सातत्याने संघर्ष करीत होते त्यांच्यासाठी एक उत्तम कालावधी येेथे निर्माण होणार आहे. गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीने नोकरी बढतीचे योग निर्माण होऊ शकतात. तसेच जे जातक नोकरीच्या शोधात असतील त्यांना उत्तम नोकरी या काळात प्राप्त होऊ शकते. किंवा काही जातक नोकरीत बदल करुन नव्या ठिकाणी वाढवून मिळालेल्या पगारासह रुजु होतील. किंबहूना व्यवसायाच्या दृष्टीने देखील हे गुरु परिवर्तन वृषभ जातकांसाठी अत्यंत उपयुक्त व लाभदायक राहिल.
एकंदरीत विचार केला असता राशी परिवर्तन करुन वृषभ राशीच्या कर्म स्थानात आलेले गुरु महाराज हे तुम्हाला कौटुंबिक, सांपत्तीक म्हणजे धन, कुटुंब, संपत्तीच्या बाबतीत, सोबतच वास्तु, वाहन, जमीन, सुखशांतीच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत प्रचंड यश देतील. स्पर्धकांवर तुम्ही मात करु शकाल. तुमचा एखादा न्यायालयीन प्रश्न प्रलंबित असेल तर त्यातही यशाची टक्केवारी वाढलेली असेल. अर्थात तुमच्या मूळ केसवर बरंच काही अवलंबून राहिल. तरी तुमच्याकडून केस लागण्याची टक्केवारी निश्चितच वाढलेली असेल. अशा पद्धतीने अनेक दृष्टींनी तुमच्यासाठी लाभदायक असलेलं हे गोचर पुढील वर्षी १३ एप्रिल पर्यंत सुरु राहिल. त्यानंतर गुरु महाराज जेव्हा स्वत:च्या मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा त्याचेही अत्यंत शुभ फळं तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार आहेत. म्हणजे पुढील कालखंड हा एकूणच तुमच्यासाठी मोठा लाभदायक असणार आहे. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यायला हवा. धन्यवाद! शुभम भवतु!


एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८