Skip to content
Home » गुरु परिवर्तन – धनु रास

गुरु परिवर्तन – धनु रास

भाग्यातून प्राप्ती लाभाची
दिशा योग्य ठेवा परिश्रमाची

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर धनु राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. ग्रहांचं भ्रमण व त्यामध्यमातून विविध राशींमध्ये त्यांचा होणारा प्रवेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. काही ग्रहांचा परिणाम तर दीर्घकाळ होणारा असतो. कारण ते एका राशीत दीर्घकाळ विराजमान असतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह म्हणजे गुरु महाराज होय. ते आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात. मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरु ग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं. म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक-आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी मानणसाचं आयुष्य घडत असतं. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे. ते म्हणजे गरु महाराज होय.
आता आनंदाची बाब म्हणजे ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे.
या दिवशी गुरु महाराज मकर या नीच राशीतून कुंभ या वायुतत्त्वाच्या राशीत जातील. या दोन्हीही राशी शनि महाराजांच्या आहेत. मात्र मकर आणि कुंभ राशीमध्ये काही मुलभूत फरक आहेत. मकर ही श्रमीक रास मानली जाते तर कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. ज्ञानाचे कारक ग्रह असल्यामुळे गुरु महाराजांना बुद्धिमान असलेली कुंभ रास बर्‍यापैकी मानवते. तर मकर रास अजिबात मानवत नाही. अजून एक बाब म्हणजे कुंभ राशीनंतर मीन रास येणार असते. जी गुरु महराजांची रास आहे. कुंभ राशीतून जेव्हा त्यांचं मार्गक्रमण सुरु असतं तेव्हा त्यांना आपल्या घराचे वेध लागतात. स्वराशीकडे जाणारा ग्रह हा कुठेतरी आनंदात असतो की मी आता फिरुन फिरुन खूप थकलो. आता मी माझ्या घरी जाणार आहे. त्याचं देखील एक शुभत्व प्राप्त होतं. याशिवाय निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कुंभ राशीत गुरु अकरावे होतात. ते स्थान गुरु महाराजांना विशेष मानवतं. कारण ते लाभ आणि इच्छापूर्तीचं स्थान आहे. शिवाय गुरु महाराजांचं सगळ्यात मोठं कारकत्व काही असेल तर गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे दाता होय. त्यामुळे लाभ आणि इच्छापूर्ती करणं हे त्यांचं नैसर्गिक कारकत्व ठरतं. नेमक्या त्याच स्थानात आता गुरु महाराज जाणार आहेत. त्यामुळे मागील काही काळात समाजात जी मरगळ आलेली आहे, ती आता दूर होऊ शकते. सोबतच आर्थिक बाबींना गती प्राप्त होईल. थोडक्यात, गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचे अत्यंत शुभ परिणाम विविध राशींवर होणार आहेत. त्यातल्या त्यात काही राशींसाठी हे राशी परिवर्तन विशेष भाग्योदयाचं, प्रगतीचं ठरणार आहे. काही राशींसाठी हे गोचर प्रचंड मोठा आर्थिक लाभ प्राप्त करुन देईल. कौटुंबिक लाभ देईल. किंबहूना काही राशी ज्या मागील काही वर्षांपासून अत्यंत त्रासात आहेत, त्यांच्यासाठी सौख्याचे, प्रगतीचे दरवाजे घडतील. त्यात धनु राशीवर गुरु महाराजांच्या या गोचरचा काय परिणाम पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कारण ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. तुमचं व्यक्तिमत्त्व, तुम्ही स्वत:, तुमचं आयुष्य, तुमचं एकंदरीत समाजातील अस्तित्व, वागणं, बोलणं अशा तुमच्या सर्वच गोष्टींवर गुरु महाराजांचा प्रभाव पडत असतो. गुरु महाराजांमुळेच तुम्ही ध्येय निश्चिती करुन वाटचाल करतात. त्यांच्यामुळेच तुम्ही प्रचंड परिश्रम करतात. कारण तुमचे राशी स्वामी स्वत: गुरु महाराज आहेत. याशिवाय धनु पत्रिकेत गुरु महाराजांना चतुर्थ स्थान देखील प्राप्त झालेले आहे. त्यामुळे वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्वही गुरु महाराजांकडेच येतं. एकंदरीत धनु पत्रिकेसाठी गुरु हा ग्रह कारक असून अत्यंत महत्त्वाचा आहे. गेली काही दिवस ते तुमच्या कुटुंब स्थानातून प्रवास करीत आहेत. तिथे मकर ही त्यांची नीच रास येते. राशी स्वामी स्वत: नीच अवस्थेत असल्यामुळे कुठेतरी कौटुंबिक ऐक्यात बाधा येण्यासारख्या विविध प्रश्नांचा तुम्हाला सातत्याने सामना करावा लागत होता. अर्थात तिथे उपस्थित असलेल्या स्वराशीच्या शनि महाराजांमुळे त्यांचा नीचभंग झालेला होता. मात्र एखादा ग्रह जेव्हा नीच होतो तेव्हा तो स्वत:च्या इच्छेने फार जास्त शुभ फळं देऊ शकत नाही. गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. शिवाय ते तुमचे राशी स्वामी देखील आहेत. त्यामुळे त्यांचीच जास्तीत जास्त शुभ फळं देण्याची इच्छा असते. मात्र ते स्वत: जेव्हा नीच अवस्थेत असतात, तेव्हा ते शक्य होत नाही. म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्या नैसर्गिक कारकत्वात येथे उणिव निर्माण होते.
गुरु महाराज आता राशी परिवर्तन करुन तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रमाचं, प्रवासाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच ते उपयच स्थान देखील आहे. राशी स्वामी जेव्हा परिश्रमाच्या स्थानात जातो तेव्हा परिश्रमात प्रचंड वृद्धी होत असते. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२१ ते १३ एप्रिल २०२२ हा काळ तुमच्यासाठी प्रचंड परिश्रमाचा, पराक्रमाचा राहणार आहे. सोबतच या काळात तुम्ही प्रवास देखील भरपूर करणार आहात. तुमच्या भावंडांसाठी देखील हा काळ सुखकारक आहे. भावंडांसोबतच्या तुमच्या नात्याला समृद्ध करणारा हा कालखंड असेल. थोडक्यात राशी स्वामी गुरु महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
गुरु महाराज ज्या स्थानात विराजमान असतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांची दृष्टी पडते त्या स्थानांच्या फळांमध्ये ते वृद्धी करीत असतात. कारण त्यांची दृष्टी ही अमृततुल्य मानली जाते. त्यानुसार तृतीय स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान मानलं जातं. या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे तुमच्या कौटुंबिक ऐक्यात वाढ होईल. मागील काळात तुमच्या कुटुंबामध्ये कारण असतांना आणि नसतांनाही जे विसंवाद झाले होते त्याच्यातून कुठेतरी तुमची सुटका होईल. कारण धनु जातकांचं लक्ष हे सतत आपल्या कामावरच असतं. ध्येय निश्चिती करुन तुम्ही त्यानुसार काम करीत असतात. किंबहूना ध्येय गाठणं हा तुमचा मूळ स्वभावच असतो. मात्र घराची शांती जर भंग झाली तर या बाबतीत तुम्हाला कुठेतरी अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कौटुंबिक ऐक्य तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. जे या काळात वाढणार आहे. सोबतच जोडीदाराचं सहकार्य देखील वाढणार आहे. विशेषत: २० नोव्हेंबरला जेव्हा गुरु महाराज राशी परिवर्तन करतील तेव्हा बुध ग्रह देखील तुळ राशीत विराजमान असेल. त्यामुळे गुरु-बुध यांच्यात नवपंचम योग घडून येईल. जो तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहिल. तसेच जेव्हा जेव्हा गुरु आणि बुध यांच्यात नवपंचम योग होईल किंवा त्रिएकादश योग होईल, ज्याला आपण लाभ योग देखील म्हणतो, तेव्हा या शुभत्वात अजून मोठी वाढ तुम्हाला प्राप्त होईल. परिणामी या काळात जोडीदाराशी सुंसवाद वाढेल. ज्याचा तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच तुमच्यासाठी ते लाभदायक देखील राहिल.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडत आहे. गेली काही वर्षांमधील प्रभाव बघता धनु जातकांना भाग्याकडून योग्य ते सहकार्य प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या परिश्रमाने, कर्मानेच यश मिळवावे लागत आहे. मात्र आता ही स्थिती थोडीशी बदलणार आहे. कारण गुरु महाराजांची अमृत दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडत आहे. परिणामी भाग्याद्वारे योग्य ते सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. तसेच एकाच वेळी सप्तम आणि भाग्य अशा दोन्ही स्थानांवर दृष्टी पडत असल्यामुळे जोडीदाराकडून भाग्यवृद्धी हा देखील एक भाग येथे निर्माण होईल. म्हणजे जोडीदाराच्या सहकार्याने तुमच्या भाग्यात वृद्धी घडून येईल. थोडक्यात मागील काळातील परिस्थिती लक्षात घेता हा काळ तुमच्यासाठी मोठा भाग्योदयाचा राहिल. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सदुपयोग करायला हवा.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडणार आहे. येथे लक्षात घ्यायची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भाग्य आणि लाभ ही दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानं जर गुरु महाराज समृद्ध करीत असतील तर त्यासारखी मोठी बाब दुसरी कुठलीच नाही. म्हणजे गुरु महाराज तुम्हाला परिश्रम करायला लावत आहेत. सातत्याने तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. परिश्रमा सोबतच ते तुमच्या भाग्यातही वृद्धी करीत आहेत. म्हणजे तुम्ही जे प्रयत्न करीत आहात त्यात ते तुम्हाला भाग्याची साथ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सोबतच म्हणजे या दोन्ही गोष्टी केल्यानंतर त्यांची फलश्रृती म्हणून ते तुम्हाला लाभही मिळवून देणार आहेत. म्हणजे गुरु महाराज दोन्ही हातांनी तुम्हाला भरभरुन लाभ देणार आहेत. अर्थात तो किती प्राप्त होईल ते सर्वस्वी तुमच्या परिश्रमावर अवलंबून असेल. कारण तुम्ही परिश्रम कराल, प्रयत्न कराल तर तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होईल आणि त्यानंतरच तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करायला हवेत आणि ते तुम्ही करणारही आहात. कारण तो तुमचा मूळ स्वभाव आहे.
थोडक्यात गुरु महाराजांच्या या गोचरमुळे सप्तम, भाग्य आणि लाभ या तीन स्थानांची अत्यंत शुभ फळं धनु जातकांना प्राप्त होणार आहेत. ते तुमचे राशी स्वामी आहेत आणि नैसर्गिक शुभ ग्रह देखील आहेत. त्यामुळे या तीन स्थानांवरील त्यांची शुभ दृष्टी तुम्हाला अत्यंत शुभ फळांची प्राप्ती करवून देईल. मात्र परिश्रमाला पर्याय नाही. कारण गुरु महाराज स्वत: परिश्रमाच्या स्थानात जाऊन बसलेले आहेत. ते तुमच्याकडून परिश्रमही करवून घेणार आहेत. त्यामुळे त्याचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा. धन्यवाद!
शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८